अ‍ॅपशहर

बहुजन पुरोहित निर्माण करणारे स्कूल

कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या संघर्षमय जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग म्हणून ‘वेदोक्त प्रकरणा’ची नोंद घेतली गेली.

Maharashtra Times 21 Feb 2017, 3:00 am
kumar.kamble@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kolhapur shahu vaidik school
बहुजन पुरोहित निर्माण करणारे स्कूल

Tweet : @kumarkMT

कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या संघर्षमय जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग म्हणून ‘वेदोक्त प्रकरणा’ची नोंद घेतली गेली. शाहू महाराज ज्या सांस्कृतिक सत्तांशी संघर्ष करीत होते त्यांपैकी एक धार्मिक सत्ता होती. महाराजांच्या आयुष्यात १८९९ च्या सुमारास घडलेल्या वेदोक्त प्रकरणामुळे महाराष्ट्रात मोठा सामाजिक संघर्ष निर्माण झाला.

‘वेदोक्त’ की ‘पुराणोक्त’ या संघर्षातून महाराष्ट्राचे सांस्कृतिक अवकाश ढवळून निघाले. सर्वसत्ताधीशाला शुद्र मानून त्याच्यासंदर्भातील विधी जर पुराणोक्त पद्धतीने होत असतील तर गरिबी, दारिद्र्य आणि निरक्षरता यात वर्षानुवर्षे पिचलेल्या ब्राह्मणेतर बहुजनांची काय अवस्था असेल, असा विचार शाहू महाराजांनी त्यावेळी केला आणि या सांस्कृतिक सत्तेला शिवाजी वैदिक विद्यालयाची स्थापना करुन मोठा हादरा दिला. तत्कालीन ब्राह्मणी व्यवस्थेचे धार्मिक जोखड फेकून देण्यासाठी महाराजांनी जुलै १९२० ला उचलेले हे पाऊल महाराष्ट्राच्या धार्मिक आणि पर्यायाने सांस्कृतिक सत्ताकारणात उलथापालथ घडवणारे ठरले.

माणसाची धार्मिक भूक भागविण्यासाठी जे-जे विधी केले जातात, त्यासाठी ब्राह्मण भटजीवर अवलंबून रहावे लागत असे. त्यामुळे विधी करण्यासाठी ब्राह्मणेतर समाजाची हरेकप्रकारे अडवणूक केली जात असे. आर्थिक शोषण होत असे. त्यामुळे बहुजनांचे धार्मिक विधी भटजीविना अडू नयेत, यासाठी महाराजांनी हे विद्यालय सुरू केले.

जवळपास शंभर वर्षे या विद्यालयाच्या माध्यमातून बहुजन-मराठा समाजातील पुरोहित घडविण्याचे काम सुरू आहे. दरवर्षी सुमारे तीस ते पस्तीस विद्यार्थी येथे प्रवेश घेतात. विद्यालयाच्या बिंदू चौकातील इमारतीत रोज संध्याकाळी वर्ग सुरू असतात. थोडेफार लिहिता वाचता येते, अशा कोणत्याही समाजातील व्यक्तीला हे शिक्षण घेण्याची मुभा आहे. आज याच विद्यालयाचे नामकरण शाहू वैदिक विद्यालय असे करण्यात आले आहे.

आजही येथे मोफत शिक्षणाबरोबरच राहण्याची व्यवस्थाही मोफत आहे. त्यामुळे आतापर्यंत शेकडो विद्यार्थी या विद्यालयाने तयार केले असून, अनेकजण बहुजन समाजासाठी धार्मिक कार्य करु लागले आहेत.

शाहू एज्युकेशन सोसायटीच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या या विद्यालयाच्या अध्यक्षपदाची धुरा किशोर तावडे यांच्याकडे आहे तर विक्रमसिंह यादव सेक्रेटरी आहेत. बाजीराव चव्हाण मुख्य गुरुजी आहेत. येथे शिकविण्यात येणारा अभ्यासक्रम तीन वर्षाचा आहे. श्री गणेशापासून संकल्प, सत्यनारायण पूजा, होमहवन, वास्तूशांती, लग्नविधी, रूद्राभिषेक ते अंतेष्टी, पंचांग असे सर्व विधी ये‌थे शिकवले जातात. त्यानंतर विद्यार्थ्यांची परीक्षा होते. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यालयाच्यावतीने त्याला प्रमाणपत्र मिळते.


राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी ज्या हेतूने या विद्यालयाची स्थापना केली, त्याच हेतूने आणि प्रेरणेने या विद्यालयाचे काम सुरू आहे. वैदिक पद्धतीने धार्मिक विधीचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही ‌समाजातील व्यक्तीला येथे मोफत शिक्षणाची व्यवस्था आहे.
- विक्रमसिंह यादव, सेक्रेटरी



संस्थेचे संकल्प

संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भविष्यात वाढविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातही धार्मिक विधी करणाऱ्यांची मोठी गरज असते. त्या भागात प्रशिक्षणाची व्यवस्था गरजेची आहे. त्यादृष्टीने पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील मुलांसाठी संस्कृत श्लोक पठण स्पर्धा घेण्यात येणार आहेत. संस्थेची माहिती सर्व जगभर पोहोचावी, यासाठी लवकरच वेबसाइटही सुरू करण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज