म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
शहरात अनेक उद्याने कडक उन्हापासून नागरिकांना सावली, मोकळा श्वास आणि सहवास देतात. मात्र, या उद्यानांची म्हणावी तशी निगा प्रशासनाने ठेववलेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महावीर उद्यान असे असुविधांच्या विळख्यात सापडले आहे. या उद्यानात रोज शेकडोलोक येत असतात. उद्यानाजवळ जिल्हाधिकारी कार्यालय, उद्योग भवन तसेच जिल्हा परिषदेचे कार्यालय असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून असंख्य लोक येथे येत असतात. त्यांच्यासाठी महावीर उद्यान ही हक्काची जागा आहे. तसेच संध्याकाळी लहान मुलांसाठी येथे 'किडझोन' तयार होतो. कॉलेजवयीन तरुण ते ज्येष्ठ नागरिकांसाठी जिव्हाळ्याचे ठिकाण असलेल्या महावीर उद्यानातील समस्यांकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.
विद्युत वायरी उघड्यावर
बागेच्या प्रवेशद्वाराजवळच विद्युत वायरी धोकादायक स्थितीत उघड्यावर पडल्याचे आढळतात. अनेक विद्युत खांबांच्या वायरीची टोके उघडी पडली आहेत. यामुळे लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांना गंभीर इजा होण्याची शक्यता अधिक आहे. विद्युत पेटीचा दरवाजा खुला असून त्यात वायरींचे अस्ताव्यस्त जाळे बाहेर पडले आहे.
कचऱ्याचे साम्राज्य
बागेतील प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला कचरा आढळतो. तसेच उद्यानात आतील भागात कागदाचे बोळे, प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची आवरणे असा कचरा आढळतो. उद्यानाच्या समोरील मुख्य भागात अनेक खाद्यपदार्थांच्या गाड्या असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात कचरा आढळतो. यात सिगारेटी व गुटखा आदीची पाकिटे आढळतात. तसेच इतर प्लास्टिक कचरा फेकला जातो. बागेत महाविद्यालयीन तरुण वाढदिवस साजरा केल्यानंतर झालेला कचरा अस्ताव्यस्त फेकत असल्याने घाणीचे साम्राज्य तयार होत असते.
खेळाच्या साहित्याची मोडतोड
लहान मुलांसाठी असलेल्या किडझोनमधील खेळाच्या साहित्याची मोडतोड झाली आहे. या ठिकाणी असलेल्या भिंतीचे सिमेंट आवरण निघून गेले आहे. मुलांसाठी असलेल्या प्लास्टिकच्या साधनांना छिद्र पडली आहेत. तसेच किडझोनजवळील विद्युत खांब नादुरुस्त असून वायरी उघड्यावर आहेत. लहानग्यांसाठी असणाऱ्या झोपाळ्याचे खांब उभे असून झोपाळा गायब आहे. येथे मुलांसाठी पुरेशी खेळाची साधने उपलब्ध करून देण्याची गरज आहे. बैठकीसाठी असलेले बाकड्याची मोडतोड देखील झाली आहे.
पाणीपुरवठा नियोजन गरजेचे
बागेसाठी केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. अनेकदा झाडांना अतिप्रमाणात दिले जाणारे पाणी साठून राहिल्याने त्याला तळ्याचे स्वरुप आले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरची सोय आहे पण सध्या फिल्टर मशीन नादुरुस्त असून लोकांना मोठ्या टाकीतील अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. फिल्टर मशीनची तत्काळ दुरुस्ती झाल्यास नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळेल.
बागेतील वातावरण आल्हाददायक असून प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यामध्ये प्रसाधनगृहांची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय व्हायला हवी. परिसर स्वच्छतेकडे प्रशासनाबरोबर नागरिकांनी लक्ष देण्याची गरज आहे. स्वयंशिस्त पाळल्यास बागेतील वातारवण चांगले राहण्यास मदत होईल.
यशवंत पाटील