महाराष्ट्रभर हजारो मुले
कृतज्ञता सत्कार सोहळ्यात एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज यांचे भाषण साऱ्यांच्या मनाला स्पर्शून गेले. त्यांनी अतिशय मनमोकळेपणाने उपस्थितांशी संवाद साधला. बालपणातील आठवणी, आई-वडिलांचे संस्कार, जातीभेद, धर्मभेद न पाळायची शिकवण, कबड्डी चॅम्पियन अशा विविध आठवणी जागवल्या. आमचं ११ भावडांचे कुटुंब म्हणजे एका अर्थी क्रिकेटची टीम होती असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. एन. डी. पाटील व त्यांच्या वैवाहिक जीवनातील आठवणी, जीवाची मुंबई करण्यासाठी केलेला प्रवासही उपस्थितांशी शेअर केला. एनडी पाटील हे गरीबांचे अश्रू पुसण्याचे काम करत असल्याची जाणीव झाल्यावर त्यांना कार्याला कधीही विरोध केला नाही. आयुष्यभर समाजहितासाठी संघर्ष केल्यामुळे अफाट लोकसंग्रह निर्माण झाला आहे. रयतसारखा मोठा परिवार आहे. गांधारीला शंभर मुले आहेत. मात्र आम्हाला शिक्षण, सामाजिक चळवळीमुळे महाराष्ट्रातून हजारो मुले मिळाली. ही सगळे मुले मला माझीच वाटतात. त्यामुळे आम्हा दोघांना म्हातारपणाची भीती वाटत नाही असे त्यांनी उद्गार काढताच सभागृह भावूक बनले. याप्रसंगी डॉ. शैला दाभोलकर यांनी मनोगत व्यक्त केले.