म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर
सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल करून फसवणूक केल्याप्रकरणी जयसिंगपूरचे तत्कालीन मंडल अधिकारी एन. बी. बाणदार व तलाठी शंकर सुतार यांच्याविरूध्द जयसिंगपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तलाठी अमोल आनंदा जाधव यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सन २००८ मध्ये मंडलअधिकारी बाणदार व तलाठी सुतार यांनी त्यांच्या व अन्य जणांच्या फायद्याकरिता अधिकारपदाचा गैरवापर केला. सरकारच्या मूळ दस्ताऐवजामध्ये बदल करून खोटी कागदपत्रे तयार केली. पहिला फेरफार नोंदविला असताना त्याच क्रमाकांचा दुसरा फेरफार नोंद करून सर्व्हे क्रमांक १८४/७ च्या उतार्यामध्ये फेरफार क्रमांक ८७४९प्रमाणे नोंद केली. तसेच सर्व्हे क्रमांक १८४/४ अ, १८४/ब व १८४/क असे नविन सातबारा तयार करून सरकारची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तलाठी जाधव यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तत्कालीन मंडल अधिकारी बाणदार व तलाठी सुतार यांच्या विरूध्द फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणात आणखी तिघांचा समावेश असल्याचे समजते. सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे तपास करीत आहेत.