म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
हातकणंगले तालुक्यातील माणगाव हे 'जिल्हा स्मार्ट ग्राम'ठरले आहे. राज्य सरकारने बुधवारी जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम म्हणून माणगावची घोषणा केली. गावाला ५० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते २६ जानेवारी रोजी पुरस्कार वितरण सोहळा आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षातील कामकाज व विकास योजनांच्या अंमलबजावणीच्या आधारे पुरस्काराची घोषणा होते.
गावातील भौतिक सुविधा, ग्रामविकास, स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापन अशा विविध बाबींचा विचार करून पुरस्कारासाठी निवड केली जाते. सरकारने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेच्या निकषात, स्वरुपात बदल करून २१ नोव्हेंबर २१०६ रोजी 'स्मार्ट ग्राम'नावांनी योजना सुरू केली. योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातून एका गावाची निवड होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वखालील सात अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पहिल्या क्रमांकांच्या गावाची पुन्हा एकदा जिल्हास्तरीय समितीकडून तपासणी होते. जिल्हा स्मार्ट ग्राममध्ये माणगावने बाजी मारली. माणगावची लोकसंख्या १८ हजार आहे. ग्रामपंचायतीवर आवाडे गटाची सत्ता आहे. सरपंचपदी वसुधा बने तर उपसरपंचपदी राजगोंडा पाटील आहेत. 'गावामध्ये शंभर टक्के एलइडी बल्ब, सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधा आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ग्राम तक्रार निवारण केंद्र सुरू केले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड, स्मशानभूमीचे सुशोभिकरण केले आहे' अशी माहिती ग्रामपंचायतीमधील आवाडे गटाचे प्रमुख राजू मगदूम यांनी दिली.
यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार लटकला
जिल्हा परिषदेमार्फत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार दिला जातो. दरम्यान गेल्यावर्षी हा पुरस्कार माणगावला की हात्तीवडेला द्यायचा यावरुन पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत झाले नाही. अध्यक्षा शौमिका महाडिक आणि महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम यांचे दीर राजू मगदूम यांच्यामध्ये वाद झाला होता. वादामुळे अद्याप हा पुरस्कार जाहीर झाला नाही.