म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर
प्रेमविवाहास विरोध करून नवविवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी विवाहितेचे वडील व आतेभाऊ यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. बसगोंडा बाबू आवटी (वय ४६, रा. अकिवाट), संदीप श्रीपाल हुक्कीरे (वय २५, रा. धरणगुत्ती) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत विवाहितेचा पती स्वप्नील सुरेश पल्लके यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, फिर्यादी स्वप्नील व बसगोंडा आवटी यांची मुलगी भाग्यश्री यांच्यात प्रेमसंबंध होते. वडिलांचा विवाहास विरोध असल्याने भाग्यश्री व स्वप्नीलने २९ मार्च, २०१६ रोजी नृसिंहवाडी येथे विवाह केला. यानंतर ते दाम्पत्य जयसिंगपूर येथे १३ व्या गल्लीत चौगुले यांच्या घरात भाड्याने रहात होते.
१३ मे रोजी भाग्यश्रीचे वडील व आतेभाऊ संदीप हे दोघे जयसिंगपूर येथे आले. त्यांनी भाग्यश्रीस घरी चल, स्वप्नीलला सोडून दे असे म्हणून त्रास दिला. ते निघून गेल्यानंतर भाग्यश्रीने विषारी औषध प्राशन केले. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. प्रेमविवाहास विरोध करून त्रास दिल्यानेच भाग्यश्रीने आत्महत्या केल्याचे पती स्वप्नीलने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी नवविवाहितेचे वडील व आतेभाऊ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.