म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाने पश्चिम महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांबाबत चर्चा करण्यासाठी तातडीने शनिवारी (ता. १६) कराड येथे क्लस्टर टीमची बैठक बोलावली आहे. बैठकीत निवडणुकीची व्यूहरचना करण्यात येणार असून वरिष्ठ पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री के. पी. मौर्य हे १८ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, सातारा, माढा या लोकसभा मतदारसंघांतील भाजपच्या क्लस्टर टीमची ही तातडीची बैठक होणार आहे. बैठकीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजय पाटील यांच्यासह दिल्लीतील पदाधिकारी तसेच पाच लोकसभा मतदारसंघातील महानगर अध्यक्ष, जिल्हाधक्ष, लोकसभा आणि विधानसभा प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
मौर्य सोमवारी कोल्हापुरात
उत्तरप्रदेशचे उप मुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य सोमवारी (ता. १८) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यात ते लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करणार आहेत. साखर कारखानदार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी ते चर्चा करण्याची शक्यता आहे.