मालिका भाग - दोन
फोटो आहे मेघडंबरी व एसटीपी दुधाळी
Maruti.Patil
@timesgroup.com
tweet: @MarutipatilMT
कोल्हापूर : महापालिकेच्या एकूण उत्पन्नातील ६५ टक्के खर्च कर्मचाऱ्यांचे वेतन आणि यापूर्वी घेतलेल्या कर्जावर खर्ची पडत असल्याने विकासकामांवर प्रचंड मर्यादा आल्या आहेत. तरीही गेल्या तीन वर्षांत महापालिकेने स्वनिधीतून राजर्षी शाहू समाधिस्थळ विकास, दुधाळी सांडपाणी प्रकल्प, शिवाजी चौक सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. स्वनिधीचे 'अमृत' मिळाल्याने सर्व कामे प्रगतिपथावर आहेत, तर अमृत योजनेतून ड्रेनेजलाइनच्या कामाला सुरुवात करून महापालिकेने विकासकामाचा एक टप्पा पूर्ण केला आहे.
रस्ते, पाणी, लाइट, स्वच्छता या पायाभूत सुविधा महापालिकेकडून पुरवल्या जातात. याचबरोबर उद्यानाचा विकास करून विरंगुळा केंद्रांची निर्मिती केली जाते. महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत पाहता पायाभूत सुविधा देताना महापालिकेच्या मर्यादा अनेकदा स्पष्ट होतात. एकूण उत्पन्नाच्या ६५ टक्के खर्च कर्मचाऱ्यांचे वेतन आणि घेतलेल्या कर्जावर खर्ची पडत असले, तरी गेल्या तीन वर्षांत कासवगतीने का असेना अनेक प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहेत. महापालिकेच्या स्वनिधीसोबत सरकारच्या निधीतून अनेक विकासकामे मार्गी लागल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसते. शहर विकासासाची कामे मार्गी लागताना प्रभागातील कामावरून मात्र ते नाराजीचा सूर आळवतात.
शहराच्या पर्यटनात वाढ व्हावी आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती चिरंतर ठेवण्यासाठी शाहू समाधिस्थळाचा विकास करण्याचा निर्णय घेतला. मेघडंबरीसह समाधिस्थळाचा विकास करताना तब्बल चार कोटी ६५ लाखांचा आराखडा तयार केला. यातील बहुतांश कामे पूर्णत्वाकडे गेली असून लवकरच लोकापर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. शाहू समाधिस्थळाबरोबरच शिवाजी चौकाचे सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. विशेषत: दोन्ही कामे महापालिकेच्या स्वनिधीतून केली जात आहे. तसेच रंकाळा संवर्धनासाठी चार कोटी २५ लाखांचा निधी महापालिकेला मिळाला असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.
पंचगंगा नदीच्या प्रदूषणामध्ये शहरातील सांडपाणी नेहमीच भर घालते. शहरातील १२ नाले वळवून प्रदूषण रोखण्याचा नियोजने केले होते. मात्र, यापैकी केवळ दुधाळी नाल्यावरील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात महापालिकेला यश आले. सुमारे १६ कोटी रुपये खर्च करून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नुकताच कार्यान्वित केला. त्यामुळे वारंवार राष्ट्रीय हरित लवादाच्या फटकाऱ्यांतून महापालिकेला काही प्रमाणात सुटका झाली. त्याचबरोबर राज्य सरकारकडून अमृत योजनेमधून ११३ कि.मी. ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी ७० कोटी ७० लाखांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यापैकी प्रत्यक्षात १० कोटींचा निधी प्राप्त झाला असून, ड्रेनेजलाइनच्या कामाने गती घेतली आहे. महापालिकेचा कार्यकाळ संपण्यास अद्याप दोन वर्षांचा काळ शिल्लक असला, तरी उर्वरित दोन वर्षांत आणखी कोणते प्रकल्प मार्गी लागतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
०००
तीन वर्षांतील प्रगतिपथावरील प्रमुख कामे
शाहू समाधिस्थळ विकास
दुधाली एसटीपी प्लांट
पंचगंगा घाट संवर्धन
शिवाजी चौक सुशोभिकरण
रंकाळा सुशोभिकरण
०००
आघाडी सरकारच्या काळात महापालिकेला भरघोस निधी मिळाला. पण सध्याच्या सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. अमृत योजनेचा अपवाद वगळता एकही मोठी योजना सरकारकडून मिळालेली नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पदाचा शहराच्या विकासासाठी फायदा झालेला नाही.
शारंगधर देशमुख, गटनेते, काँग्रेस
०००
स्वनिधीतून नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यास सत्ताधारी व विरोधी पक्ष म्हणून यशस्वी झालो. सरकारकडून अनेक विकास योजनांसाठी निधी मिळाला, पण निधीचा पाठपुरावा करण्यास सक्षम अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने निधी मिळण्यास दिरंगाई होते. मात्र, महापालिकेच्या निधीतून तीन वर्षांत अनेक दर्जेदार कामे झाली आहेत.
विजय सूर्यवंशी, गटनेते, भाजप
००००