म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'नोटबंदीबरोबर सीबीआय संचालक व रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची प्रथम नियुक्ती व नंतर मंजुरी असे 'हम करे सो कायदा'प्रमाणे घेतलेले निर्णय पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचा हुकूमशहा बनायचे आहे,' असा जोरदार हल्लाबोल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. ६० महिन्यात मोदींनी देशाचा बट्याबोळ केला आहे, अशी कडवट टीकाही त्यांनी केली.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सायंकाळी जवाहरनगर चौकात आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार व स्थानिक काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, 'अर्थमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्ष नेता व पंतप्रधान यांच्या सह्यांशिवाय सीबीआय संचालक व रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांची नियुक्ती करता येत नाही. पण, मोदी यांनी ती पद्धत मोडीत काढून प्रथम आदेश व नंतर मंजुरी, सह्या अशी एकतंत्री पद्धत अवलंबली आहे. घटना, मंत्रिमंडळ बाजूला ठेवून सर्व सत्ता हातात एकवटण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत. यातून त्यांना देशाचा हुकूमशहा बनायचे असल्याचे दिसून येते. रशियामध्ये ज्यांनी मदत केली, त्यांना पुतीन यांनी ज्या प्रकारे एक तर घरी बसवले किंवा खून केला त्याचप्रकारे मोदी यांची वाटचाल सुरू आहे. २००२ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांच्यावर गोध्रा हत्याकांडाचा ठपका ठेवत राजीनामा देण्याची मागणी काँग्रेस व इतर पक्षांनी केली होती. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी यांनी पाठराखण करत त्यांना वाचवले. त्याच अडवाणींना पाच वर्षांत बोलू दिले नाही. आता उमेदवारीही दिली नाही. मुरली मनोहर जोशी यांनाही बाजूला केले. यातून पुतीन यांच्यासारखीच त्यांची वाटचाल दिसते.'
... .. .. .. ... ..