प्रस्थापितांविरोधात लढणारे एन. डी. हिंमतवान नेता
'एन डी' हे हिंमतवान नेतामेधा पाटकर, विवेकाचा आवाज बुलंद करण्याचा संकल्पम टा...
'एन. डी.' हे हिंमतवान नेता
मेधा पाटकर, विवेकाचा आवाज बुलंद करण्याचा संकल्प
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'सध्या देशातील राजकारणाची वाटचाल मूल्यहिनतेच्या दिशेने सुरू आहे. लोकशाहीची गटारगंगा बनल्यासारखी स्थिती आहे. धर्म मूलतत्ववादी, जातीवादी, मनुवादी हे एकीकडे महात्मा गांधींना कवेत घेतल्याचे दर्शवितात. वास्तवात ते देशात धर्मांधतेचे वातावरण निर्माण करत आहेत. अशा कठीण कालखंडात डॉ. एन. डी. पाटील यांनी बुद्धिजीवी आणि श्रमजीवी घटकांची सांगड घालून विवेकाचा जागर मांडला. वंचितांसाठी प्रस्थापितांशी लढणारा हा हिंमतवान नेता प्रत्येक चळवळीला हवाहवासा वाटतो' अशा शब्दांत नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या, मेधा पाटकर यांनी त्यांच्या कार्याला सलाम केला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे डॉ. एन. डी. पाटील यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आजपर्यंतच्या कार्यकर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. राजर्षी शाहू स्मारक भवनात रविवारी सायंकाळी आयोजित या समारंभास राज्यातील विविध भागातील सामाजिक, शैक्षिणक व चळवळीच्या क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थिती लावली होती. मानपत्र, मानचिन्ह, शाल आणि गुलाब फूल देऊन एन. डी. पाटील व त्यांच्या पत्नी सरोज यांचा गौरव झाला.
तब्बल अडीच तासांहून अधिक काळ रंगलेल्या या कृतज्ञता सोहळ्यात समाजासाठी आयुष्य अर्पित केलेल्या या लोकनायकाच्या सत्काराप्रसंगी उपस्थित नागरिकांनी उभे राहून टाळ्यांचा गजर करत त्यांच्या कार्याला अभिवादन केले. तसेच विवेकाचा आवाज बुलंद करण्याचा हात उंचावून संकल्पही केला. खचाखच भरलेल्या सभागृहात विविध वक्त्यांनी डाव्या पुरोगामी चळवळीतील बापमाणूस अशा शब्दांत पाटील यांच्या कार्याचा गौरवोल्लेख केला.
एनडींच्या कार्याचे वेगळेपण सांगताना मेधा पाटकर म्हणाल्या, 'शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आणि महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहाची सांगड घालत एनडींनी आंदोलनची नवी रणनिती आखली व विविध जनचळवळींना बळ दिले. जल, जमीन आणि जंगल या घटकांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना एनडी हे आधारवड ठरले. त्यांच्यामुळे एन्रॉनविरोधी चळवळ अधिक प्रखर होण्यास मदत झाली. नैतिकता, अभ्यासूवृत्ती आणि दमनशक्तीला न जुमानता आंदोलन करण्याची हिंमत यामुळे प्रत्येक क्षेत्रात एनडी हवेत असे म्हणणारे नेते वेगवेगळ्या चळवळीत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांचा विचारशीलतेचा वारसा जपताना त्यांनी जातीयवाद, अंधश्रद्धा, बाजारुपणा, भांडवलदार, धर्मभेद अशा घटकांना उखडून टाकण्याची ऊर्जा समाजात निर्माण केली. सध्या विकासाच्या नावाखाली मानवी हक्कच नाकारण्याचा खटाटोप सुरू असताना त्याविरोधात हिकमतीने लढणारे एनडी लाखमोलाचे आहेत.'
याप्रसंगी आमदार जयंत पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अकोल्याचे महादेव भुईभार यांची भाषणे झाली. अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. कवी प्रा. एकनाथ पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले.
दाभोळकरांच्या कार्याप्रती कृतज्ञ
'महाराष्ट्राला अंधश्रध्देच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्य समर्पित केले. दाभोलकर कुटुंबीय त्याच ध्येयवादी वृत्तीने त्यांच्या कार्याचा वारसा चालवित आहेत. हे कार्य राज्याला आणि राष्ट्रासाठी आधारवड ठरणारे असून त्यांच्याप्रती मी कृतज्ञ आहे' असे भावोत्कट उद्गार डॉ. एन. डी. पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना काढले. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याला उजाळा देत, त्या विचारांशी असलेले आपले नाते सांगत पाटील म्हणाले, 'नवी वाट धुंडाळताना मार्गात खाचखळगे, दगडगोटे असणार आहेत. ते पार करण्याचे
सामर्थ्य चळवळीत आहे. कर्मवीर अण्णांनी शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणांचा पाया घातला. त्यामुळे महाराष्ट्राला आधुनिक चेहरा प्राप्त झाला.'