म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मधून तमाम भारतवासीयांना 'पंढरीची वारी एकदा अनुभवावी' असे आवाहन केले. वारीची महती सांगण्यासाठी मंगळवार पेठेतील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाचे कार्यकर्ते संतोष गाताडे यांनी मोदींना सूचना केली होती.
'मन की बात' मध्ये देशातील विविध समस्या, उपाय व अन्य विषयांवर सूचना पाठविण्यासाठी आवाहन केले जाते. गाताडे यांनी 'नमो अॅप'वर सोमवारी (ता.२३) आषाढी एकादशीदिवशी वारीची महती मोदींनी देशवासीयांना सांगावी अशी सूचना केली होती. रविवारी 'मन की बात'चे प्रदर्शन आकाशवाणी व दूरदर्शनवर झाले. त्यामध्ये पंढरीच्या वारीचे महत्त्व सांगण्याची सूचना केल्याबद्दल मोदींनी गाताडे यांचे 'धन्यवाद संतोषजी' अशी सुरुवात करून वारीची माहिती दिली. मोदींनी नऊ मिनिटे पंढरपूरचे माहात्म्य, संतांची समतेची परंपरा याविषयी माहिती सांगून 'पंढरीची वारी एकदा अनुभवावी' असे आवाहन केले. 'मन की बात' हा कार्यक्रम थेट ऐकता आला नाही, अशी खंत गाताडे यांनी व्यक्त केली. मित्रांनी यू ट्यूटचा व्हिडीओ पाठविल्यानंतर आपल्याला माहिती कळाली. त्यामुळे खूप आनंद वाटल्याचे त्यांनी सांगितले. गाताडे हे मंगळवार पेठेतील प्रिन्स क्लब परिसरात राहतात. त्यांनी कॉमर्स कॉलेजमध्ये बी. कॉम.ची पदवी घेतली असून, त्यांचे कपिलतीर्थ मार्केटमध्ये किराणा मालाचे दुकान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ते कार्यरत असून, कसबा गेटजवळील महावीर सेवाधामद्वारे ते सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. ते गोंदवले ते म्हसवड अशी पंढरीची वारी करतात. शिवाजी विद्यापीठ ग्रुपमधील त्यांचे ४० सहकारी वारीत सहभागी झाले होते. वारीचा अनुभव अवर्णनीय व मनशांती देणारा, समतेची शिकवण देणारा असल्याने आपण मोदींना सूचना केली होती, असे गाताडे यांनी सांगितले.