म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
नोव्हेंबर अखेर गाळप केलेल्या उसाची एफआरपीप्रमाणे रक्कम न दिल्याप्रकरणी प्रादेशिक साखर सहसंचालक विभागाने कोल्हापूर विभागातील १४ साखर कारखान्यांना नोटीस बजावली आहे. विभागातील ७५४ कोटी रुपये एफआरपी थकीत असून व्याजासह शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश दिले असून त्याचा अहवाल मंगळवारपर्यंत (ता. १८) देण्याचे आदेश दिले आहेत. कारवाई केलेल्या यादीत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील प्रत्येकी सात कारखान्यांचा समावेश आहे.
ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांनी एफआरपीनुसार उत्पादकांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचा कायदा आहे. पण कोल्हापूर व सांगली विभागातील कारखान्याकडे सुमारे ७५४ कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रयत क्रांती संघटनेने एफआरपी अधिक दोनशे रुपयांची मागणी केली होती. पण एकरकमी एफआरपी देणे अशक्य असल्याचे सांगत कारखानदारांनी जिल्ह्यातील कारखाने बंद ठेवले होते. अखेर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांमध्ये एकरकमी एफआरपी देण्याचा तोडगा काढल्यानंतर कारखाने सुरू झाले. १२ नोव्हेंबरला जिल्हयातील सर्व कारखान्यांनी गाळप सुरू केले. नोव्हेंबर अखेर जिल्ह्यातील कारखान्यांनी ३५ लाख टन उसाचे गाळप केले आहे. कारखाने सुरू होऊन एक महिना उलटूनही एफआरपी जमा न झाल्याने साखर आयुक्तांच्या आदेशानुसार प्रादेशिक साखर सह संचालकांनी बडगा उचलला असून नोटिसा पाठवल्या आहेत. पहिल्या टप्यात नोव्हेंबरअखेर एफआरपी न देणाऱ्या १४ कारखान्यांना नोटीस पाठवल्या आहेत. अन्य कारखान्यांना पुढील आठवड्यात नोटिसा पाठवण्यात येणार आहेत. नोव्हेंबरची थकीत एफआरपी व्याजासह देऊन त्याचा अहवाल घेऊन उपस्थित रहावे, असा आदेश साखर सह संचालकांनी काढला आहे.
नोटिसा दिलेले कारखाने
कोल्हापूर : जवाहर (हुपरी), दूधगंगा वेदगंगा (बिद्री), ओलम अॅग्रो (राजगोळी), दत्त (शिरोळ), शरद (नरंदे), छत्रपती शाहू (कागल).
सांगली : सोनहिरा, राजारामबापू (युनिट साखराळे), राजारामबापू (युनिट वाटेगाव), राजारामबापू (कारंदवाडी), हुतात्मा किसन, क्रांती कुंडल (कुंडल), दत्त इंडिया (सांगली)