म. टा. वृत्तसेवा, कागल
'दसऱ्याच्या मुहूर्तावर सर्वांच्या साक्षीने बोलत आहे. काहीही होऊ दे आता विधानसभा निवडणुकीमधून माघार घेणार नाही. उचललेली तलवार विजय मिळवल्याशिवाय खाली ठेवणार नाही' अशी घोषणा समरजितसिंह घाटगे यांनी केली. तमनाकवाडा (ता. कागल) येथे झालेल्या युवक व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी बिद्री साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब पाटील होते.
समरजितसिंह घाटगे म्हणाले, 'आतापर्यंत राजे गट समीकरण कसे जुळणार या चर्चेत अडकला होता. त्यामुळे गटाचे नुकसान झाले. आता कोणत्याही समीकरणात अडकू नका. कामाला लागा. योद्ध्याच्या मागे समिकरणे जुळून येतात. श्रेयवादात अडकलेले नेते पंधरा वर्षे आमदार, मंत्री होते. मग रखडलेले तलाव, बंधारे, गडहिंग्लजची हद्दवाढ याबाबतीत झोपा काढत होते का? कोणत्या गावात सत्ता आहे याचा विचार न करता २३ गावात ४३ कोटींच्या पेजल योजना मंजूर केल्या. काम करण्याची धमकच असावी लागते. गावागावात बोअर मारल्याने पाण्याचे प्रश्न सुटत नाहीत. मात्र, बंधारे झाले. पाणी जिरवले तर प्रश्न सुटतो. चिकोत्रा प्रकल्पावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. आरळगुंडीसाठी २७ लाख रुपये मंजूर केले. यामुळे 'चिकोत्रा'त आठ ते दहा टक्क्यांनी पाणी वाढेल. हळदी, बेनिक्रे, मासा बेलेवाडी, माद्याळ येथे बंधारे, तलाव यासाठी सरकार आणि राजे फाउंडेशन काम करत आहे.'
वाढदिवसानिमित्त दिलीप तिप्पे यांचा सत्कार झाला. दत्ताजीराव घाटगे, दिलीप तिप्पे, बाबासाहेब पाटील, सागर मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. जलस्वराज्यचे अध्यक्ष उमेश देसाई, अमरसिंह घोरपडे, सुनील सूर्यवंशी, संदीप तिप्पे आदी उपस्थित होते. गोपी पोवार यांनी स्वागत केले. भिकाजी तिप्पे यांनी आभार मानले.
तुम्हीच मध्यस्थी करा
आमदार हसन मुश्रीफ यांच्या 'मीच परमनंट आमदार' या घोषणेवर समरजितसिंह घाटगे म्हणाले, 'कंसही स्वतःला परमनंट राजा म्हणायचा. पण त्याचाही वध 'बच्चा'नेच केला. जनता मलाच निवडून देईल ही मग्रुरी माझ्यात नाही. पण, जनतेवर विश्वास आहे. जय-पराजय काळच ठरवेल. आम्ही पाठीशी आहे असे दत्ताजीराव घाटगे म्हणतात. समीकरणे जुळवून आणण्यासाठी त्यांनीच मध्यस्थी करावी.'
तमनाकवाडा : युवक व शेतकरी मेळाव्यात बोलताना समरजितसिंह घाटगे. शेजारी बाबासाहेब पाटील, दिलीप तिप्पे, उमेश देसाई आदी. (छायाचित्र: सार्थक फोटो, कापशी)