म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'फिक्स मानधन'च्या मागणीसाठी आशा कर्मचारी व गट प्रवर्तकांनी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी थाळीनाद करत सरकारचा निषेध केला. मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महिलांनी दुपारी दोनच्या सुमारास अचानकपणे जिल्हा परिषदेचे चारही प्रवेशद्वार रोखले. जि.प.मध्ये ये-जा करण्यास मज्जाव केल्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांची पंचाईत झाली. अधिकाऱ्यांची वाहने रोखल्याने काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान, कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानधन निश्चित करण्यासंदर्भात मोठ्या संख्येने एसएमएसही केले. बुधवारी आशा कर्मचाऱ्यांनी भर पावसात जवळपास चार तास जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मारला होता.
आशा वर्कर्सच्या राज्यव्यापी संघटनेने ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व युनियनतर्फे मंगळवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास शेकडो महिला जि.प.समोर आल्या. त्यांनी सरकारविरोधी घोषणा देत रस्त्यावर ठिय्या मारला. 'वा रे मोदी तेरा खेल सस्ती दारू महँगा तेल, एक रुपयाचा कडिपत्ता सरकार झालंय बेपत्ता,'अशा घोषणा दिल्या. आशा कर्मचाऱ्यांना १० हजार आणि प्रवर्तकांना १५ हजार इतके मानधन निश्चित करावे ही प्रमुख मागणी आहे. संघटनेच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन निवेदन दिले. जिल्हाध्यक्षा नेत्रदीपा पाटील, उज्ज्वला पाटील, संगीता पाटील, सुप्रिया गुदले, आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.
०००
अधिकारी, कर्मचाऱ्यांची पंचाईत झाली
आंदोलनात दुसऱ्या दिवशी महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. पावसाच्या सरी अंगावर झेलत त्यांनी जिल्हा परिषदेसमोरील मुख्य प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू केली. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद केली. दुपारी दोनच्या सुमारास महिला कर्मचारी आक्रमक झाल्या आणि त्यांनी जोरदार घोषणेबाजी करत जि.प.ची चारही प्रवेशद्वारे रोखली. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची पंचाईत झाली. कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेतून आत बाहेर जाण्यास मज्जाव केला. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मोटारही अडविली. आंदोलनाची व्याप्ती वाढल्यानंतर पोलिसांनी जादा कुमक मागवली.
०००००