म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील असलेल्या महिला पोलिस अधिकारी गेल्या दीड वर्षापासून बेपत्ता आहेत. अश्विनी राजू गोरे (मूळ रा. आळते, ता. हातकणंगले) असे या अधिकाऱ्याचे नाव असून, त्या दीड वर्षापूर्वी मुंबईतील कळंबोली ठाण्यात कार्यरत होत्या. मुंबईतूनच त्या बेपत्ता झाल्या असून, त्यांच्या नातेवाईकांनी हायकोर्टात धाव घेऊन संशयित पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. वरिष्ठ पोलिस अधिकारीच संशयिताचा बचाव करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप एपीआय गोरे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
आळते येथील अश्विनी बिद्रे यांचा २००५ मध्ये हातकणंगलेतील राजू गोरे यांच्याशी विवाह झाला. २००६ मध्ये त्या पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा पास झाल्या. त्यांचे पहिले पोस्टिंग पुण्याला झाले. त्यानंतर सांगली येथे बदली झाली. सांगलीत काम करताना त्यांची वरिष्ठ अधिकारी अभय कुरुंदकर यांच्याशी ओळख वाढली. या काळात दोघांमधील जवळीक वाढली. २०१३ मध्ये अश्विनी यांची बदली रत्नागिरी येथे झाली. कुरुंदकर रत्नागिरीत जाऊन अश्विनी यांना भेटत असल्याने अश्विनी आणि त्यांचे पती राजू यांच्यात खटके उडाले. २०१४ पासून अश्विनी आणि राजू गोरे हे दोघे विभक्त राहतात, असे समजले.
‘अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी पोलिस महासंचालकांची भेट मागितली होती. मात्र त्यांची भेट मिळाली नाही. महासंचालकांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना भेटण्याचा सल्ला मोबाइल मेसेजवरून दिला. पोलिस दलातील महिला अधिकारी बेपत्ता झाल्याची तक्रार वरिष्ठांकडे करूनही तिच्या तपासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. संशयितांवर काहीच कारवाई केली जात नाही. काही वरिष्ठ अधिकारीच हे प्रकरण दडपत आहेत,’ असा आरोप राजू गोरे यांनी केला आहे. या आरोपांमुळे पुन्हा एकदा पोलिस खात्याची काळी बाजू समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अश्विनी आणि राजू गोरे या दाम्पत्याला नऊ वर्षांची मुलगी आहे. ही मुलगी तिच्या लहानपणापासूनच वडिलांकडे राहते.
कोर्टात पुरावेही सादर
कळंबोली पोलिस ठाण्यात बदली झाल्यानंतर अश्विनी यांच्याशी संपर्क होत नसल्याने नातेवाईकांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये हायकोर्टात धाव घेतली. राजू गोरे यांनी अश्विनी आणि संशयित अभय कुरुंदकर यांच्यातील मोबाइलवरील संवादाचे पुरावेही कोर्टात सादर केले. कुरुंदकर यांनी मोबाइलवरून अनेकदा अश्विनी यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती, असा गोरे कुटंबीयांचा आरोप आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार फेब्रुवारी २०१७ मध्ये संशयित कुरुंदकर यांच्यावर कळंबोली ठाण्यात गुन्हा दाखल झाला, मात्र अद्याप त्याची चौकशी झाली नाही, असे राजू गोरे यांनी सांगितले. सध्या अभय कुरुंदकर हे ठाणे ग्रामीणला आहेत.
दोघेही कोल्हापूरचे
अश्विनी गोरे हातकणंगले येथील आहे, तर अभय कुरुंदकर हेही कोल्हापुरातील आहेत. मुंबई पोलिसांकडे धाव घेऊनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाद न घेतल्याने अश्विनीच्या नातेवाईकांनी हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाच्या आदेशानंतरही संशयित अभय कुरुंदकर यांच्यावर कारवाई झालेली नाही. उलट तुमच्या आणि मुलीच्या जिवाला धोका असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. कुरुंदकर यांनीच अश्विनीच्या जिवाचे बरेवाईट केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.
पतीला गायब करण्याची धमकी
संशयित कुरुंदकर आणि अश्विनी या दोघांचे मोबाइलवरील संभाषण नातेवाईकांनी हायकोर्टात सादर केले आहे. या संभाषणात कुरुंदकर यांनी अश्विनीचे पती राजू गोरे यांना गायब करण्याची धमकी दिली होती. शिवाय तिला जिवे मारण्याचीही वारंवार धमकी दिली आहे. अश्विनी यांनी कळंबोली येथील फ्लॅटमधील संगणकात सर्व संभाषण ठेवले आहे. नातेवाईकांना फ्लॅटमधील संगणकातून संभाषण मिळाले.
मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील असलेल्या महिला पोलिस अधिकारी गेल्या दीड वर्षापासून बेपत्ता आहेत. अश्विनी राजू गोरे (मूळ रा. आळते, ता. हातकणंगले) असे या अधिकाऱ्याचे नाव असून, त्या दीड वर्षापूर्वी मुंबईतील कळंबोली ठाण्यात कार्यरत होत्या. मुंबईतूनच त्या बेपत्ता झाल्या असून, त्यांच्या नातेवाईकांनी हायकोर्टात धाव घेऊन संशयित पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. वरिष्ठ पोलिस अधिकारीच संशयिताचा बचाव करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप एपीआय गोरे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
आळते येथील अश्विनी बिद्रे यांचा २००५ मध्ये हातकणंगलेतील राजू गोरे यांच्याशी विवाह झाला. २००६ मध्ये त्या पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा पास झाल्या. त्यांचे पहिले पोस्टिंग पुण्याला झाले. त्यानंतर सांगली येथे बदली झाली. सांगलीत काम करताना त्यांची वरिष्ठ अधिकारी अभय कुरुंदकर यांच्याशी ओळख वाढली. या काळात दोघांमधील जवळीक वाढली. २०१३ मध्ये अश्विनी यांची बदली रत्नागिरी येथे झाली. कुरुंदकर रत्नागिरीत जाऊन अश्विनी यांना भेटत असल्याने अश्विनी आणि त्यांचे पती राजू यांच्यात खटके उडाले. २०१४ पासून अश्विनी आणि राजू गोरे हे दोघे विभक्त राहतात, असे समजले.
‘अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी पोलिस महासंचालकांची भेट मागितली होती. मात्र त्यांची भेट मिळाली नाही. महासंचालकांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना भेटण्याचा सल्ला मोबाइल मेसेजवरून दिला. पोलिस दलातील महिला अधिकारी बेपत्ता झाल्याची तक्रार वरिष्ठांकडे करूनही तिच्या तपासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. संशयितांवर काहीच कारवाई केली जात नाही. काही वरिष्ठ अधिकारीच हे प्रकरण दडपत आहेत,’ असा आरोप राजू गोरे यांनी केला आहे. या आरोपांमुळे पुन्हा एकदा पोलिस खात्याची काळी बाजू समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अश्विनी आणि राजू गोरे या दाम्पत्याला नऊ वर्षांची मुलगी आहे. ही मुलगी तिच्या लहानपणापासूनच वडिलांकडे राहते.
कोर्टात पुरावेही सादर
कळंबोली पोलिस ठाण्यात बदली झाल्यानंतर अश्विनी यांच्याशी संपर्क होत नसल्याने नातेवाईकांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये हायकोर्टात धाव घेतली. राजू गोरे यांनी अश्विनी आणि संशयित अभय कुरुंदकर यांच्यातील मोबाइलवरील संवादाचे पुरावेही कोर्टात सादर केले. कुरुंदकर यांनी मोबाइलवरून अनेकदा अश्विनी यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती, असा गोरे कुटंबीयांचा आरोप आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार फेब्रुवारी २०१७ मध्ये संशयित कुरुंदकर यांच्यावर कळंबोली ठाण्यात गुन्हा दाखल झाला, मात्र अद्याप त्याची चौकशी झाली नाही, असे राजू गोरे यांनी सांगितले. सध्या अभय कुरुंदकर हे ठाणे ग्रामीणला आहेत.
दोघेही कोल्हापूरचे
अश्विनी गोरे हातकणंगले येथील आहे, तर अभय कुरुंदकर हेही कोल्हापुरातील आहेत. मुंबई पोलिसांकडे धाव घेऊनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाद न घेतल्याने अश्विनीच्या नातेवाईकांनी हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाच्या आदेशानंतरही संशयित अभय कुरुंदकर यांच्यावर कारवाई झालेली नाही. उलट तुमच्या आणि मुलीच्या जिवाला धोका असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. कुरुंदकर यांनीच अश्विनीच्या जिवाचे बरेवाईट केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.
पतीला गायब करण्याची धमकी
संशयित कुरुंदकर आणि अश्विनी या दोघांचे मोबाइलवरील संभाषण नातेवाईकांनी हायकोर्टात सादर केले आहे. या संभाषणात कुरुंदकर यांनी अश्विनीचे पती राजू गोरे यांना गायब करण्याची धमकी दिली होती. शिवाय तिला जिवे मारण्याचीही वारंवार धमकी दिली आहे. अश्विनी यांनी कळंबोली येथील फ्लॅटमधील संगणकात सर्व संभाषण ठेवले आहे. नातेवाईकांना फ्लॅटमधील संगणकातून संभाषण मिळाले.