म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास वेगाने व्हावा यासाठी केंद्र व राज्य सरकारवर दबाव वाढविण्यासाठी निर्भय मॉर्निंग वॉकमध्ये जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,' असे आवाहन अभिनेते डॉ. शरद भुथाडिया यांनी केले. राजारामपुरी परिसरात रविवारी सकाळी निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन केले होते, यावेळी ते बोलत होते.
ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निर्भय मॉर्निंग वॉकला सुरुवात झाली. आईचा पुतळा, शाहूनगर रोड, जगदाळे कॉलनी, प्रतिभानगर, राजारामपुरी पोलिस चौकीमार्गे आईचा पुतळा असा निर्भय वॉक करण्यात आला. दाभोलकर, पानसरे, प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांचे खुनी मोकाट फिरत असताना केंद्र व राज्य सरकारकडून मारेकऱ्यांना पकडण्यात अपयश आले आहे. तपासातील निष्क्रियेबद्दल सरकारला जाब विचारण्यासाठी दर महिन्याच्या २० तारखेला निर्भय वॉकचे आयोजन करण्यात येते. निर्भय वॉकमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
समारोपप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे बाबूराव कदम म्हणाले, 'दाभोलकर, पानसरे यांचे खुनी पकडण्यासाठी सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही. त्यामुळे मारेकरी मोकाट फिरत आहे.' सरकारवर दबाव वाढविण्यासाठी निर्भय वॉकमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. शरद भुताडिया यांनी केले. यावेळी यश अंबोळे यांनी चळवळीतील गीते सादर केली. निर्भय वॉकमध्ये कॉ. बी. एल. बरगे, व्यंकप्पा भोसले, मेघा पानसरे, हसन देसाई, दिलीप पोवार, संभाजी जगदाळे, प्रा. टी. एस. पाटील, अश्विनी ओतारी, शंकर काटोळे, कपिल मुळे, प्रशांत काकरे, स्वाती कोरे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. पुढील निर्भय वॉक २० जूनला रेसकोर्स नाका टिंबर मार्केट कमानीपासून सुरू होणार आहे.
००००००००००००००००००००००