वाहतूक नियंत्रकाची उद्धट उत्तरे
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
केएमटीचे वाहक, चालक नसल्याचा फटका नेहमीच प्रवाशांना बसतो. त्याचे प्रत्यंतर शुक्रवारी कागल,नागाव, भुये, वडगाव मार्गावरील प्रवाशांना आले. तासानंतरही केएमटी न आल्याने प्रवाशांनी शिवाजी पुतळा येथील वाहतूक नियंत्रकांची भेट घेतली. पण त्यांचे समाधान न करता नियंत्रकांनी उद्धट उत्तरे दिली. केएमटी फायद्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असताना नियोजनाचा अभाव आणि कर्मचाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या उत्तरामुळे केएमटीपासून प्रवासी दूर जाण्याची शक्यता आहे.
सकाळी १२९ पैकी ९८ बसेस मार्गस्थ होतात. पण दुपारी ड्युटी बदलल्यानंतर यातील सुमारे १५ ते १८ बसेस कमी होतात. परिणामी प्रवाशांना तासनतास केएमटीची वाट पाहावी लागते. शुक्रवारी सायंकाळी नागाव, जठारवाडी, वडगाव, कागल येथे जाणारे प्रवासी मध्यवर्ती बसस्थानकांवर थांबले होते. तास दोन तासांची प्रतीक्षा करुनही बस न आल्याने प्रवाशांनी शिवाजी पुतळा येथील वाहतूक नियंत्रकांचे कार्यालय गाठले. यामध्ये महिलांचाही समावेश होता. पण प्रवाशांचे समाधान न करता 'आम्ही पास काढण्यास सांगितले होते का, चालक नसल्यामुळे तीन शेड्युल्ड बंद पडली आहेत,' अशी उद्धट उत्तरे देण्यात आली. घरी जाण्यासाठी पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी आलेल्या प्रवाशांचा मात्र अशा उत्तरांमुळे चांगलाच हिरमोड झाला. काही प्रवाशांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही फोन केला. मात्र तरीही केएमटी न आल्याने प्रवाशांनी अन्य मार्गांचा वापर करुन घरी जाणे पसंत केले.