म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदासंघातील मतमोजणी गुरुवारी (ता. २३ मे) होणार आहे. मात्र, रविवारीच दिवसभर मतमोजणीच्या ठिकाणी आवश्यक त्या पद्धतीने बॅरीकेड्स बांधण्यात आले. केंद्रात सीसीटीव्ही बसविण्यात आले असून मत मोजणीसाठी २० टेबल लावले आहेत. केंद्रात इंटरनेटची जोडणी करण्यात आली असून उद्या (मंगळवारी) इंटरनेटची चाचणी आणि मतमोजणीदिवशी ज्या पद्धतीने फेरीनिहाय मतसंख्या ऑनलाइन भरायची आहे, त्याचा डेमो होईल. दरम्यान, दोन्ही मतमोजणी केंद्रांबाहेर १६ ठिकाणी स्क्रीन लावण्यासंबंधी तांत्रिक माहिती घेतली जात आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी रमणमळ्यातील शासकीय गोदामात तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी शिवाजी विद्यापीठासमोरील राजाराम तलावाशेजारी शासकीय गोदामात मतमोजणी होईल. एका लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय २० टेबलांवर मतमोजणीला एकाचवेळी सुरूवात होईल. मतमोजणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता राहण्यासाठी मतमोजणीच्या ठिकाणी एकूण १२ सीसीटीव्ही बसवण्यात आले. उमेदवारांच्या प्रतिनिधींना टेबलनिहाय रांगेत बसवण्यासाठी बॅरीकेड्स बांधण्यात आले.
मतमोजणीच्या २० टेबलांवर प्रत्येकी एक आणि निवडणूक निर्णय अधिकारी, पोष्टल मतमोजणी ठिकाणीच्या ठिकाणी एक असे एकूण एका उमेदवारांचे २८ प्रतिनिधी असतील. त्यांच्यासह मतमोजणी कर्मचारी अधिकाऱ्यांना फेरीनिहाय निकाल ऐकण्याची उत्सुकता असणार आहे. त्यांच्यासाठी प्रत्येक मतमोजणीच्या ठिकाणी आठ स्क्रीन लावण्यासंबंधी तांत्रिक मार्गदर्शन घेतले जात आहे. तांत्रिकदृष्या हे शक्य न झाल्यास फळ्यावर फेरीनिहाय मते लिहिली जातील. मतमोजणी केंद्राबाहेरही सहा ठिकाणी स्क्रीन लावण्याचे नियोजन आहे. स्क्रीनची जागा निश्चित केली जात आहे. प्रत्यक्षात मतमोजणी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोन टप्यांत प्रशिक्षण देण्यात आले. २२ मे रोजी शेवटची रंगीत तालीम होणार आहे. त्यानंतर गुरुवारी सकाळी ७ वाजता थेट मतमोजणीला प्रारंभ होईल. १४ ऐवजी २० टेबलांवर इव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी होणार आहे. इव्हीएमची मतमोजणी दुपारी तीन वाजेपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर व्हीव्हीपॅटवरील चिठ्या मोजणीला केली जाणार आहे.
व्हीव्हीपॅटमुळे लागणार विलंब
यंदा पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटवरील चिठ्या मोजल्या जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच केंद्रांवरील चिठ्या मोजल्या जातील. निवडणूक प्रशासनाने पाच केंद्रांत एकाचवेळी चिठ्या मोजण्याची तयारी केली प्रशासनाने केली होती. त्यानुसार सायंकाळी सहा पर्यंत निकाल लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र निवडणूक आयोगाने एकावेळी एकाच केंद्रातील चिठ्या मोजाव्यात अशी सूचना दिली. परिणामी अंतिम निकाल लांबणार आहे.
भोजनाची व्यवस्था
मतमोजणीच्या ठिकाणीच अधिकारी, कर्मचाऱ्यांना जेवण पोहोच केले जाणार आहे. जेवण, नाष्टा दर्जेदार असावा, अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत. दर्जा तपासण्यासाठी आज (सोमवारी) अधिकारी जेवण, नाष्ट्याची चव तपासणी केली जाईल. भोजन, पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा, माध्यम कक्षही स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षावरील कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे.
कोट
मतमोजणीच्या ठिकाणी आवश्यक सुविधा निर्माण केल्या आहेत. बॅरीकेड्स, इंटरनेट, सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तयारी पूर्ण होत आली आहे. व्हीव्हीपॅटमधील चिठ्यांमुळे निकालास उशीर झाला तरी सूक्ष्म नियोजन केल्याने कोणतीही अडचण येणार नाही.
- नंदकुमार काटकर, अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी