म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
राज्यभरातून कोल्हापुरातील पूरग्रस्तांवर दातृत्वाचा वर्षाव होत आहे. जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून पोहोच केलेल्या साहित्याचे वाटप केले जात आहे. शहर, परिसर आणि जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रापंचिक आणि दैनंदिन साहित्य वाटपाला वेग आला आहे. शहरात महापालिका प्रशासन आणि खेड्यांत महसूल यंत्रणेच्या पुढाकाराने प्रापंचिक साहित्य आणि पूरग्रस्तांना पाच हजार रुपये अर्थसाह्य दिले जात आहे.
प्रशासनाशी संपर्क साधून दिलेल्या मदतीचे साहित्य ठेवण्यासाठी अंबप फाटा, शिरोली, जिल्हा परिषद कागलकर हाउस येथील गोडाऊनमध्ये उतरून घेतले जात आहे. दैनंदिन वस्तूंच्या पॅकिंगसाठी धैर्यप्रसाद आणि महासैनिक दरबार हॉलमध्ये दिले जात आहे. येथे पॅकिंग केलेले साहित्य पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविले जात आहे. तालुका पातळीवरून तहसीलदार, तर गावपातळीवर मंडल अधिकारी, तलाठीतर्फे मदतीचे साहित्य पोहोच केले जात आहे. यावर नियंत्रण ठेवण्याचे काम संबंधित तालुक्याचे प्रांताधिकारी करत आहेत.
तांदूळ, गहू, तूर आणि मूग डाळ, साखर, मीठ, टूथ पेस्ट, अंघोळीचा साबण, सॅनिटरी नॅपकीन बॉक्स, टॉवेल, ब्लँकेट, मुलांचे कपडे, महिलांचे कपडे, गोडे तेल, प्लास्टिक खराटे, बिस्किट बॉक्स, फिनेल, फिनेल, हेअर ऑईल, मेणबत्ती, फरसाना, डेटॉल बॉक्स, लेडीज गाऊन, दप्तर किट असे ८८ प्रकारचे साहित्य दानशूरांकडून सरकारी यंत्रणेकडे पोहोच केले जात आहे. ते गरजू पूरग्रस्तांपर्यंत पोहोचले जात आहे. प्रत्यक्ष मदत वाटपावेळी साहित्य पळवापळवीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे पोलिस बंदोबस्तही ठेवला आहे. याशिवाय मदत केंद्र उतरवून घेतले जात असलेल्या गोडाऊनजवळही पोलिस तैनात आहेत. दरम्यान, पूरग्रस्तांना पाच हजार रुपयांप्रमाणे आतापर्यंत १९ कोटी ७८ लाखांचे अर्थसाह्य आणि ४१४ टन मोफत गहू, तांदूळ वितरित केले आहे.
००००
अधिकाऱ्याची उदासीनता
जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जिल्हास्तरीय पूरग्रस्त मदत सनियंत्रण कक्ष येथील जिल्हा परिषदेत स्थापन केला आहे. कक्षाकडे सनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी राणी ताटे, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांची निवड जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांक प्रसिद्धीस देऊन ज्यांना मदत करावयाची आहे, त्यांनी ताटे आणि आडसूळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. मात्र, यातील ताटे यांच्या मोबाइलवर संपर्क साधल्यानंतर त्या मोबाईल उचलत नाहीत, अशा तक्रारी आहेत. त्यांच्या उदासीनतेमुळे पूरग्रस्तांसाठी मदत करू इच्छिणाऱ्यांत नाराजी आहे.
००००
१५ बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, शिंगणापूर, भोगावती नदीवरील हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे, तुळशी नदीवरील बीड, कासारी नदीवरील यवलूज, वारणा नदीवरील चिंचोली, दूधगंगा नदीवरील दत्तवाड, सुळकूड बंधारे पाण्याखाली आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि विशेष प्रकल्प कार्यालयाचे कार्यकारी अभियंत्यांनी बालिंगा पुलाची पाहणी केली. पाहणी पूल सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली.
०००००