म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटेनेतील नाराज कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी (ता.९) पेठवडगावमध्ये आयोजित केला आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि स्वाभिमानीचे कार्यकर्ते शिवाजी माने यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या मेळाव्यात बंडाचा झेंडा उगारण्यात येणार आहे. संघटनेत सन्मान मिळत नाही, अपमानित केले जात असल्याचा आरोप नाराज कार्यकर्त्यांचा आहे.
माने यांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले. आंदोलनात सक्रिय राहून सामान्य कार्यकर्त्यांकडे खासदार शेट्टी दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कार्यकर्त्यांमधील नाराजीसंबंधी १४ जानेवारी २०१७ रोजी खासदार शेट्टी यांच्याकडे तक्रार केली. मात्र, त्यांनी दखल घेतली नसल्याचा माने यांचा आरोप आहे. त्यातूनच माने यांनी नाराजांना एकत्र करून मेळावा आयोजित केला आहे.
'स्वाभिमानी'तून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची हकालपट्टी झाली. त्यांच्यासोबत स्वाभिमीनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जातील, असे वाटत होते, पण तसे झाले नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार शेट्टी यांना रोखण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी भाजप करत आहेत. मंत्री खोत यांचा संपर्क वाढविण्याचा आदेश आहे. त्यातून ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात जाऊन मेळावे घेत आहेत. कोणत्याही परिस्थितीत खासदार शेट्टी यांना रोखण्यासाठी पूर्ण ताकद भाजपने लावली आहे. त्यातूनच स्वाभिमानीतील नाराजांना गळ घातले जात आहे. नाराजांचा गट तयार करून खासदार शेट्टींविरोधात वातावरण तयार केले जात आहे. या संपूर्ण हालचालींवर खासदार शेट्टी बारीक लक्ष ठेवून आहेत. रविवारच्या मेळाव्यानंतर ते भूमिका मांडतील.
००००