अ‍ॅपशहर

घोंघावणाऱ्या काळाकडे सरकारी दुर्लक्ष

धोकादायक इमारती कोसळल्याच्या घटना ताज्या असतानाच सांगली महापालिकेने ही बाब गांभीर्याने मनावर घेतलेली दिसत नाही. पालिकेच्या यादीतील ४६ धोकादायक इमारतींपैैकी एक खुद्द पालिकेच्याच मालकीची असून, त्यात महापालिकेची कार्यालयेही आहेत.

Maharashtra Times 27 Jul 2017, 1:45 am
सांगली : धोकादायक इमारती कोसळल्याच्या घटना ताज्या असतानाच सांगली महापालिकेने ही बाब गांभीर्याने मनावर घेतलेली दिसत नाही. पालिकेच्या यादीतील ४६ धोकादायक इमारतींपैैकी एक खुद्द पालिकेच्याच मालकीची असून, त्यात महापालिकेची कार्यालयेही आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sangli corporation neglegent towards endangered buildings
घोंघावणाऱ्या काळाकडे सरकारी दुर्लक्ष


एखाद्याचा जीव जाईपर्यंत जाग न येणाऱ्या म्हणजे झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रशासनाला उठवायचे कसे, हा प्रश्न आहे. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीवर आलेल्या ४६पैकी सर्वाधिक सांगलीत आहेत. अत्यंत धोकादायक असलेली इमारत महापालिकेच्या मालकीची आणि महापालिकेच्या दारात आहे. ती पूर्वी अतिथीगृह नावाने ओळखली जायची. सध्या त्यामध्ये जन्म-मृत्यूची नोंद असलेली महापालिकेची कार्यालये आहेत. या इमारतीलगतची प्रसूतिगृहाची इमारतही धोकादायकच आहे. म्हणजे रोज धडधडीत नजरेला पडणारी आणि आपल्याच मालकीच्या धोकादायक इमारतींकडे प्रशासन काणाडोळा करत असेल अन्य इमारतींकडे किती दुर्लक्ष होत असेल याचा केवळ विचारच केलेला बरा.

सांगलीतील मुख्यत्वे वखार भाग, गाव भाग पेठ भाग, खण भाग,नळ भाग आणि माळी गल्लीत धोकादायक इमारतींची संख्या जास्त आहे. जामवाडीच्या परिसरातही काही इमारती धोकादायक स्थितीत आहेत. ६० ते ७० वर्षांपूर्वींच्या या इमारती असून, काही इमारती बाहेरून दगडी बांधकामाच्या भासत असल्या तरी ते बांधकाम सिमेंटमध्ये केलेले नाही. अनेक इमारतींमध्ये लाकडाचा वापर जास्त आहे. कौलारू छताच्या या इमारती कोणत्याही क्षणी जमीनदोस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

धोकादायक इमारतींच्या बाबतीत ठोस काहीच होत नाही. मधूनच जाग आल्यासारखे करून कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काहीच होत नाही. अनेक धोकादायक इमारतींचे काही भाग अधूनमधून कोसळतात. काही इमारती कोणत्याही क्षणी जमीनदोस्त होतील, अशी स्थिती आहे. भाडेकरू आणि मालक यांच्यातील वाद न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे मालक इमारत कोसळण्याची वाट पाहत आहेत. काही इमारतींबाबत स्थानिक अधिकाऱ्यांचे हितसंबंध आड येत असल्याची चर्चा आहे.

अलीकडे काही जण इमारतीमधील भाडेकरूंच्या हक्कासह इमारत विकत घेतात आणि मग भाडेकरूंना हाकलण्यासाठी दंडुकेशाहीचा अवलंब करतात. अशा दंडुकेशहांच्या मदतीला पालिकेचे अधिकारी धावून जातात. इमारत धोकादायक झाल्याची नोटीस देऊन भाडेकरुंचा विरोध डावलून ती खाली करण्याची तत्परता अधिकारी दाखवत असतील तर मग खऱ्या अर्थाने धोकादायक इमारतींच्या बाबतीत ती तत्परता का दाखविली जात नाही, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

सांगलीतील प्रभाग समिती एक अंतर्गतच्या क्षेत्रात २१ धोकादायक इमारती असल्याची नोंद असल्याचे सांगून समितीचे अधिकारी अप्पा हालकुडे म्हणाले, ‘संबधित सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. काही इमारतींचा वाद न्यायालयात आहे. शेजारी बांधकाम करताना खोदाई केल्याने नजीकच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत. बालाजी चौकानजीकच्या इमारतीचा काही भाग कोसळला असून, ती अधिक धोकादायक बनली आहे. ती इमारत उतरवून धोका टाळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. वखार भाग, महावीर नगरमध्ये जुन्या इमारतींची संख्या जास्त आहे.’

प्रभाग समिती चार अंतर्गत मिरजेचा परिसर येत असून, त्या ठिकाणचे अधिकारी मेथे यांनी आपण रुजू होऊन पंधरा दिवस झाले आहोत. धोकादायक इमारतींची माहिती अद्याप घेतली नसल्याचे सांगितले. कुपवाड शहरात धोकादायक इमारतींची संख्या नगण्य आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज