म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'काँग्रेस आघाडी सरकारच्या कालावधीत आमदार सतेज पाटील हे राज्यमंत्री असले तरी खऱ्या अर्थाने मुख्यमंत्रिपद तेच चालवायचे. त्यांच्याशिवाय तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पानही हलत नव्हते,' अशी मिश्किल टिप्पणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
हॉटेल पॅव्हेलियन येथे 'व्हिजन कोल्हापूर २०२५' कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी, आमदार पाटील यांच्यावर स्तुतिसुमनेही उधळली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या दोघांतील सहज संवादही उपस्थितांत चर्चेचा विषय ठरला.
कोल्हापूरच्या इंडस्ट्रीजच्या विकासासाठी आवश्यक योजनेसंदर्भात बोलताना पाटील म्हणाले, 'आमचे सरकार आल्यावर इंडस्ट्रीजला आवश्यक पाठबळ देऊ. मात्र, या कार्यक्रमात माझ्या बाजूला सतेज पाटील बसले आहेत. त्यामुळे सत्तेत पुन्हा आमचे सरकार येणार असे म्हणणे त्यांना योग्य वाटणार नाही' असा चिमटा काढला. त्यावर आमदार पाटील यांनी 'तुमचं सरकार सत्तेवर आल्यावर तुम्ही करा, आमचे सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही करू,' असे हसत हसत त्यांनी उत्तर दिले. त्यांच्या या विधानाने कार्यक्रमस्थळी हास्य पिकले.
आमदार पाटील यांच्या विधानाचा आधार घेत पालकमंत्र्यांनी 'कोल्हापूरचे दोघेही पाटील म्हणजे मी आणि सतेज पाटील हे राज्य मंत्रिमंडळात टॉपला राहिलो. काँग्रेस आघाडीत सतेज राज्यमंत्री असले तरी मुख्यमंत्रिपद तेच चालवायचे,' अशी टिप्पणी केली. त्यानंतर त्या दोघांच्या विधानाचा आधार घेत खासदार संजय मंडलिक यांनी, 'सध्या आम्ही सत्ताधारी पक्षात तर सतेज पाटील विरोधी आघाडीत आहेत. पण कोल्हापूरच्या विकासासाठी 'आमचं ठरलंय. ते तिकडे असू दे की मी इकडे,' असे वक्तव्य करत पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट केली.
दिल्लीत आणखी एकाला प्रतिनिधित्व
कोल्हापूरच्या विकास योजनेवरून बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्येच राजकीय गुगली टाकली. 'नजीकच्या काळात दिल्लीत आणखी एकाला प्रतिनिधित्व दिले जाणार आहे,' असे सांगत राजकीय घडामोडींची उत्कंठा वाढविली. सध्या माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे. महाडिक यांनी पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र, ही भेट साखर कारखान्याच्या सॉफ्ट लोनसाठी असल्याचे महाडिक यांनी सांगितले होते.
'काँग्रेस आघाडी सरकारच्या कालावधीत आमदार सतेज पाटील हे राज्यमंत्री असले तरी खऱ्या अर्थाने मुख्यमंत्रिपद तेच चालवायचे. त्यांच्याशिवाय तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पानही हलत नव्हते,' अशी मिश्किल टिप्पणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
हॉटेल पॅव्हेलियन येथे 'व्हिजन कोल्हापूर २०२५' कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी, आमदार पाटील यांच्यावर स्तुतिसुमनेही उधळली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या दोघांतील सहज संवादही उपस्थितांत चर्चेचा विषय ठरला.
कोल्हापूरच्या इंडस्ट्रीजच्या विकासासाठी आवश्यक योजनेसंदर्भात बोलताना पाटील म्हणाले, 'आमचे सरकार आल्यावर इंडस्ट्रीजला आवश्यक पाठबळ देऊ. मात्र, या कार्यक्रमात माझ्या बाजूला सतेज पाटील बसले आहेत. त्यामुळे सत्तेत पुन्हा आमचे सरकार येणार असे म्हणणे त्यांना योग्य वाटणार नाही' असा चिमटा काढला. त्यावर आमदार पाटील यांनी 'तुमचं सरकार सत्तेवर आल्यावर तुम्ही करा, आमचे सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही करू,' असे हसत हसत त्यांनी उत्तर दिले. त्यांच्या या विधानाने कार्यक्रमस्थळी हास्य पिकले.
आमदार पाटील यांच्या विधानाचा आधार घेत पालकमंत्र्यांनी 'कोल्हापूरचे दोघेही पाटील म्हणजे मी आणि सतेज पाटील हे राज्य मंत्रिमंडळात टॉपला राहिलो. काँग्रेस आघाडीत सतेज राज्यमंत्री असले तरी मुख्यमंत्रिपद तेच चालवायचे,' अशी टिप्पणी केली. त्यानंतर त्या दोघांच्या विधानाचा आधार घेत खासदार संजय मंडलिक यांनी, 'सध्या आम्ही सत्ताधारी पक्षात तर सतेज पाटील विरोधी आघाडीत आहेत. पण कोल्हापूरच्या विकासासाठी 'आमचं ठरलंय. ते तिकडे असू दे की मी इकडे,' असे वक्तव्य करत पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट केली.
दिल्लीत आणखी एकाला प्रतिनिधित्व
कोल्हापूरच्या विकास योजनेवरून बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्येच राजकीय गुगली टाकली. 'नजीकच्या काळात दिल्लीत आणखी एकाला प्रतिनिधित्व दिले जाणार आहे,' असे सांगत राजकीय घडामोडींची उत्कंठा वाढविली. सध्या माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे. महाडिक यांनी पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र, ही भेट साखर कारखान्याच्या सॉफ्ट लोनसाठी असल्याचे महाडिक यांनी सांगितले होते.