जिल्ह्यात बऱ्याच शाळा आय.एस.ओ मानांकनाला पात्र झाल्या परंतु ज्या शाळेने ज्या सर्व शाळांना पायवाट दाखविली ती आहे, राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर प्राथमिक शाळा. मुख्याध्यापकांसह शिक्षकांची धडपड आणि प्रगतीची नस सापडलेल ग्रामस्थ यामुळे शाळा आयएसओ मानांकनाला पात्र ठरली. त्याही आधी या शाळेने विविध उपक्रम राबवून प्रशासनाचेही लक्ष वेधून घेतले आहेत.
सध्या या शाळेने राबविलेले विविध उपक्रम पाहण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हेत तर सीमाभागातील शिक्षक आणि ग्रामस्थ शाळेला भेट देतात. एकप्रकारे ही शाळा शैक्षणिक पर्यटनाचा केंद्रबिंदूच झाली आहे.
राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षणाचा पाया घातल्यानंतर कपिलेश्वर येथे १९१९ मध्ये प्राथमिक शाळा सुरू झाली. शताब्दी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या या शाळेतील २४८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. शिक्षकांचे परिश्रम आणि शाळा समिती व अधिकारी यांच्या मार्गदर्शनातून शाळेचे रूपडेच पालटले आहे. शाळेने १९८७ पासून जिल्हा आदर्श पुरस्कार घेऊन शैक्षणिक गुणवत्ता विकासाचे नियोजनपूर्वक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.
सकाळी सात ते सायंकाळी सात असे १२ तासांचे शाळेचे कामकाज करून विजेच्या भारनियमनमया काळात असणारी ‘सौर अभ्यासिका’ हे या शाळेचे वैशिष्ट्य आहे. विद्यार्थ्यानी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवलाच शिवाय शाळेतीलच शिक्षकांनी बसविलेले मुलींचे लेझीम पथक उत्कृष्ट कवायती करते. याशिवाय प्रार्थनेला ज्ञानेश्वरी वाचन आणि योगासन आदी उपक्रमही राबविले जातात. वर्ग स्वच्छ रहावा यासाठी प्रत्येकक वर्गासाठी आदर्श विद्यार्थी पुरस्कार आणि स्वच्छ वर्ग पुरस्काराची ट्रॉफी दिली जाते.
शाळेच्या भिंतींवर विविध प्रकारची माहिती आणि बलुतेदारी संस्कृती चित्ररुपात रेखाटण्यात आली आहे. ई-लर्निंग प्रोजेक्टर रुम, संगणक लॅब, प्रयोगशाळा, मुलांच्या परिपाठासाठी प्रार्थना मंदिर, व्हरांड्यात विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, त्याच्या खाली असणारी चप्पल स्टँड आदी सुविधा देण्यात आल्या आहेत.
सहकारी शिक्षक, शिक्षण समिती, माजी विद्यार्थी व ग्रामपंचायतीने केलेली आर्थिक मदत, पालक आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे शाळा हायटेक होत आहे. राज्यात आदर्श शाळा बनवून पै न् पै विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कसा वापरता येईल, अशा दृष्टीने आमचे नियोजन आहे.
- धोंडीराम चौगले, मुख्याध्यापक