दुधाचा एकच ब्रँड करण्याला प्राधान्य/ जानकर
निवडणुकीपुरतेच राजकारण करा/ चरेगावकर
.....
शेतीमालाच्या खरेदी विक्रीसाठी एजन्सी
दहा लाख शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याचा निर्धार
सरकारला सहकाराचे वावडे नाही
आंदोलन आणि अडचणीच्या काळातही सरकारकडून पाठपुरावा
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'सामान्य शेतकऱ्याला श्रीमंत बनवण्यासाठी आता कंपन्यांच्या माध्यमातून दहा लाख शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पादन दुप्पट करण्याचा प्रयोग केला जाणार आहे. यातून उत्पादित होणाऱ्या शेतीमालाच्या खरेदी-विक्रीसाठी स्वतंत्र यंत्रणा (एजन्सी) उभी करण्यात येईल. त्याचबरोबर राज्यात प्रत्येक तालुक्यात शेतीमालावर प्रक्रिया करणारे ७०० उद्योग उभे करणार आहोत,' अशी घोषणा महसूल, कृषी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे केली.
'महाराष्ट्र सक्षम आहे, राज्यात दुधाचा एकच ब्रँड करण्यासाठी साऱ्यांनी साथ द्यावी,' असे आवाहन यावेळी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले. तर, राजकारण निवडणुकीपुरतेच करा आणि सहकाराच्या उभारणीसाठी सरकारला साथ द्या, असे आवाहन महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले.
'महाराष्ट्र टाइम्स'च्या कोल्हापूर आवृत्तीच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त सहकार विषयावरील 'मेक इन कोल्हापूर' कॉन्क्लेवमध्ये उपस्थित झालेल्या चर्चेला उत्तर देताना या सर्वांनी सहकाराला बळ देण्याची ग्वाही दिली. हॉटेल सयाजी येथे हा सोहळा रंगला. कोल्हापूरचा सहकार आणि सहकारातून विकासाचा मंत्र हा 'कॉन्क्लेव'चा मुख्य अजेंडा होता. साखर उद्योग, दुग्ध व्यवसाय, बँकिंग, शेती प्रक्रिया उद्योग, औद्योगिक क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साखर कारखानदारी, बँकिंग, दूध, शेती प्रक्रिया अशा सहकारातील विविध अंगांवर सांगोपांग चर्चा झाली.
यावेळी महापौर शोभा बोंद्रे, खासदार राजू शेट्टी, आमदार हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, सुरेश हाळवणकर, डॉ. सुजीत मिणचेकर, संध्यादेवी कुपेकर, म्हाडाचे पुणे विभागाचे अध्यक्ष समरजीत घाटगे, सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम देशमुख, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते. मटा कॉन्क्लेवसाठी 'चाटे एज्युकेशन ग्रुप' हे एज्युकेशन पार्टनर तर मॉडर्न होमिओपॅथी किडनी अँड क्यूअर क्लिनिक हेल्थ पार्टनर होते. बँक ऑफ इंडिया बँकिंग पार्टनर तर जाधव इंडस्ट्रिज इव्हेंट पार्टनर होते. ज्योतिरादित्य इस्टेट डेव्हलपर्स रिअल इस्टेट पार्टनर होते.
शेती आणि सहकाराच्या माध्यमातूनच महाराष्ट्राला आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली आहे. या क्षेत्रांमध्येच महाराष्ट्राचे हित आहे हे जाणून सरकारने पावले उचलली आहेत, असे स्पष्ट करुन पालकमंत्री पाटील म्हणाले, 'शेतीतील उत्पादन वाढवण्यासाठी दहा लाख शेतकऱ्यांची जबाबदारी कंपन्यांकडे सोपवण्यात येणार आहे. त्यासाठी सरकार प्रत्येक शेतकऱ्यामागे कंपनीला ठराविक रक्कम देणार आहे. या कंपनीने त्या शेतकऱ्याच्या शेतातील मातीपरीक्षण करण्यापासून बियाणे लावण्याबरोबरच खत आणि कीटकनाशकही द्यायचे आहे. तसेच विशिष्ट प्रकारचे टॉनिकही दिले जाणार आहे. या माध्यमातून शेतीमालाचे उत्पादन दुप्पट केले जाणार आहे. त्याचबरोबर ३५० तालुक्यात तेथील शेतीमालावर प्रक्रिया करणारे किमान दोन प्रकल्प उभे केले जाणार आहेत. सहकार तत्त्वावरील प्रकल्पासाठी सोसायटी स्थापन करावी. त्यांच्यासाठी अनुदान देण्यात येईल. यातून शेतीमालाला योग्य भाव मिळेल आणि प्रत्येक तालुक्यात रोजगारनिर्मितीही होईल.'
'महाराष्ट्र टाइम्स'च्या पुणे विभागाचे वरिष्ठ संपादक पराग करंदीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कोल्हापूर आवृत्तीचे निवासी संपादक विजय जाधव यांनी 'कॉन्क्लेव'बाबतची भूमिका मांडली. मुख्य प्रतिनिधी गुरुबाळ माळी यांनी आभार मानले. निनाद काळे यांनी सूत्रसंचालन केले.