अ‍ॅपशहर

शहीद नितीन कोळी यांना अखेरचा निरोप

जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष ताबारेषेवर पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले सांगलीचे सुपुत्र नितीन सुभाष कोळी यांना आज साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. नितीन यांच्या मूळ गावी दुधगाव इथं, वारणा नदीच्या काठावर त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Maharashtra Times 31 Oct 2016, 11:18 am
मटा ऑनलाइन वृत्त । सांगली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shahid nitin koli funeral in sangli
शहीद नितीन कोळी यांना अखेरचा निरोप


जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष ताबारेषेवर पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले सांगलीचे सुपुत्र नितीन सुभाष कोळी यांना आज साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. नितीन यांच्या मूळ गावी दुधगाव इथं, वारणा नदीच्या काठावर त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले, तेव्हा या वीराला सगळ्यांनीच मनोमन सलाम केला.

शहीद नितीन कोळी यांचं पार्थिव रविवारी श्रीनगरहून पुणे विमानतळावर आणण्यात आलं होतं. तिथून ते आज पहाटे दुधगावात पोहोचलं. त्यावेळी संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला होता. भारतमातेच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या आपल्या 'गाववाल्या'ला पाहण्यासाठी पंचक्रोशीतून नागरिक लोटले होते. नितीन यांचं पार्थिव गावात पोहोचलं, तेव्हा सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. त्यांच्या एका डोळ्यात अभिमान होता, तर दुसऱ्या डोळ्यात दुःख.

सुरुवातीला नितीन यांचं पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात आलं आणि नंतर कर्मवीर चौकात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. तिथून त्यांची अंत्ययात्रा निघाली, तेव्हा 'नितीन कोळी अमर रहे'च्या घोषणा गावात घुमल्या. नितीन कोळींचे भाऊ उल्हास कोळी आणि मोठा मुलगा देवराज यांनी त्यांना मुखाग्नी दिला. या अंत्यसंस्कारांवेळी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, राजू शेट्टी उपस्थित होते.

दरम्यान, ‍कोळी यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे १५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज