म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापुराने मोठी हानी झाली आहे. राज्य सरकारने पूरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. त्यामुळे पुन्हा पुराचा सामना करण्याची वेळ येणार नाही. प्रशासनाने पूरग्रस्तांसाठी गावात निवारा केंद्रे सुरु करून त्यांचे योग्यरित्या पुनर्वसन करावे', अशी सूचना केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओला दुष्काळ जाहीर करुन त्याद्वारे मदत करता येईल का, हे पाहून राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यासंदर्भात केंद्रीय पातळीवर चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आठवले यांनी ५० लाख रूपये निधीची घोषणाही केली.
केंद्रीय मंत्री आठवले सोमवारी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी पुराचा फटका बसलेल्या हुपरी, रेंदाळ, रांगोळी, पट्टणकोडोलीसह शहरातील सिद्धार्थनगर, जुना बुधवार पेठ भागातील पूरपरिस्थितीची पाहणी केली. 'केंद्रीय समाजकल्याण विभागाकडून पंतप्रधान आवास योजना, रमाई योजनेसह अन्य योजनांतून पूरग्रस्तांना मदत करण्यासंदर्भात प्रयत्न केले जातील. तसेच उद्योगधंदे आणि व्यवसायांनाही मदत केली जाईल,' असे त्यांनी सांगितले.
'पुरामुळे गावे उधवस्त झाली असून घरे पडली आहेत. अनेकांची घरे पडण्याच्या अवस्थेत आहेत. प्रशासनाने अशा कुटुंबासाठी गावात निवारा केंद्रे सुरु करावीत', अशी सूचनाही त्यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना केली. महाराष्ट्राप्रमाणे केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटकातही महापुराने जिवितहानी झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ' कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांवर मोठी आपत्ती आली असून ती राष्ट्रीय आपत्ती म्हटली जाऊ शकते. पण त्याचे निकष काय आहेत याची केंद्रीय पातळीवर चर्चा होऊन निर्णय घेतला येईल.'
...
नदी जोड प्रकल्प झाला पाहिजे
' केंद्रीयमंत्री म्हणून काम करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नदीजोड प्रकल्पाची मागणी केली होती. पण गेल्या ७० वर्षांत नदी जोड प्रकल्पाचा पाठपुरावा काँग्रेसने केला गेला नाही. भाजप सरकारकडून हा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे समुद्राकडे जाणारे पाणी दुष्काळी भागात वळवता येईल', असे आठवले यांनी सांगितले.
...
'३७० कलम रद्द' चे समर्थन
जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे ३७० कलम केंद्राने रद्द केले आहे. भाजप सरकारच्या या निर्णयाचे आठवले यांनी समर्थन केले. या निर्णयामुळे काश्मीर भारताचा भाग असून वेगळा झेंडा, वेगळे संविधान या गोष्टी आपोआप रद्द झाल्या आहेत. ३७० कलमाला डॉ. आंबेडकरांचा विरोध होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यापुढे काश्मीरमध्ये उद्योजकांकडून मोठी गुंतवणूक होणार असून या राज्याचा मोठा विकास होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.