नागरिकांच्या आरोग्याला बाधा, प्रशासनाचे पाणी उकळून पिण्याचे आवाहन
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
पंचगंगा व भोगावती नदीच्या पाण्यात काविळीचे विषाणू घटक आढळले आहेत. यामुळे नदी प्रदूषणाचा प्रश्न आणखी तीव्र बनला आहे. शिवाय नदीकाठवरील नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. कावीळ, मलेरिया, टीबीसारखे आजार उद्भवू शकतात. या साऱ्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने विविध उपाय योजना आखल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने उपाययोजना आखल्या आहेत. ग्रामपंचायतींना सूचना केल्या आहेत. शिवाय पिण्याच्या पाण्यामध्ये योग्य प्रमाणात क्लोरिनचा वापर करावा असे सुचविले आहे. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पंचगंगा व भोगावती नदीतील पाणी दूषित झाल्यामुळे नदीकाठावरील सात गावात काविळग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. पुणे येथील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी केली होती. पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी घेतले होते. तसेच जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने औषधोपचार व इतर उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे तपासणीसाठी घेतलेल्या पाण्याच्या नमुन्याचा अहवाल उपलब्ध झाला आहे. त्यानुसार पंचगंगा व भोगावती नदीच्या पाण्यामध्ये काविळीच विषाणू घटक आढळल्यामुळे नदी प्रदूषणाची समस्या आणखी तीव्र बनली आहे.
.............