कोल्हापूर टाइम्स टीम
'विद्यापीठीय शिक्षणातून सक्षम विद्यार्थी घडला पाहिजे. पदवी प्राप्त केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांने सामाजिक बांधिलकी जपून समाजाचे आणि कॉलेजचे ऋण जपावे' असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य डॉ. एन. डी. पाटील यांनी केले. राजर्षी शाहू कॉलेजतर्फे आयोजित पदवी प्रदान समारंभात ते बोलत होते. शाहू कॉलेजचे प्राचार्य सी. जे. खिलारे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
विद्यापीठाच्या विद्या परिषदेचे सदस्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांची विशेष उपस्थिती होती. पदवी प्रदान समारंभासाठी २११ स्नातकांनी नोंदणी केली होती. बीएभाग तीनच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत चतुर्थ क्रमांक मिळविलेल्या रुबीना बशिर मुल्ला या विद्यार्थिनीला प्रथम पदवी प्रदान करण्यात आली.
प्राचार्य होनगेकर म्हणाले, 'एक चांगला माणूस व चांगला नागरिक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. विद्यापीठाच्या पदवीमुळे विद्यार्थ्यांना एक प्रकारची प्रेरणा लाभते.'
कॉलेजमधील परीक्षा विभागप्रमुख डॉ. एस. व्ही. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. समाधान जाधव यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य प्रा. आर. पी. देठे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. एम. बी. शेख, माजी प्राचार्य टी. एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.