अ‍ॅपशहर

‘ती’च्या उद्योजकतेची सातासमुद्रापार भरारी

कोल्हापूर : पतीची चारचाकी वाहनांचे पार्ट‍्स‍ तयार करण्याची कंपनी. अचानक त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. एकवेळ अशी आली की, कारखाना बंद करण्याचा विचार आला. पण काही बँका, पतसंस्थांची कर्जे, सुमारे शंभर कामगारांच्या उदरनिर्वाहाची काळजी. त्यामुळे कारखाना पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न झाले. अनंत अडचणी आल्या आणि त्यावर जिद्द आणि कष्टाने मात करीत आज या उद्योगाची भरारी अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे

Maharashtra Times 21 Sep 2017, 9:33 pm
Sachin.Yadav @timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम successful business women entrepreneur
‘ती’च्या उद्योजकतेची सातासमुद्रापार भरारी


Tweet : @SachinyadavMT

कोल्हापूर : पतीची चारचाकी वाहनांचे पार्ट‍्स‍ तयार करण्याची कंपनी. अचानक त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. एकवेळ अशी आली की, कारखाना बंद करण्याचा विचार आला. पण काही बँका, पतसंस्थांची कर्जे, सुमारे शंभर कामगारांच्या उदरनिर्वाहाची काळजी. त्यामुळे कारखाना पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न झाले. अनंत अडचणी आल्या आणि त्यावर जिद्द आणि कष्टाने मात करीत आज या उद्योगाची भरारी अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे. स्त्री शक्तीची चुणूक दाखविणाऱ्या विद्या सुनील माने यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील मे. सुनील इंडस्ट्रीज ही चारचाकी वाहनांचे सुटे पार्ट तयार करणारी कंपनी. विद्या यांचे पती सुनील यांचे सन २००० मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यानंत बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण झालेल्या विद्या यांनी उद्योग विश्वात केलेली कामगिरी नेत्रदीपक आहे. पतीच्या निधनावेळी मोठी मुलगी पाच वर्षांची आणि लहान मुलगी तीन वर्षांची होती.

पतींच्या निधनाने कारखाना बंद करण्याचा निर्णय झाला होता. पण बँका, पतसंस्थांचा कर्जाचा डोंगर, शंभर कामगारांचा संसार याची काळजी करीत कारखाना पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न विद्या यांनी केला. विद्या यांची कंपनी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीसाठी चारचाकी वाहनांचे सुटे पार्ट‍्स तयार करते. लेथ मशीनपासून सीएनसी, व्हीएमसी मशीन येथे आहेत.

सन २००० मध्ये कंपनीवर अनेक बँकांचे कर्ज होते. कामगारांचे दोन महिन्यांचे पगारही थकले होते. रॉ मटेरियल देणाऱ्या कंपनीचेही बिल थकित होते. त्यांनीही पैशासाठी तगादा लावला होता. त्यावेळी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील काही अधिकारी, दीर मिलिंद माने यांच्या सहकार्याने कंपनी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय विद्या यांनी घेतला. या निर्णयावर त्या ठाम राहिल्या विद्या या जेव्हा पहिल्यांदा कारखान्यात गेल्या, तेव्हा त्यांना एकाही पार्टचे नाव माहीत नव्हते. कंपनीचे कामकाज, उत्पादन, विक्री याचाही अनुभव नव्हता. कारखान्यात गेल्यानंतर पहिल्या दिवशीच सर्व बाबींची माहिती त्यांनी घेतली. महिनाभरात इंडस्ट्रीची तोंडओळख झाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

कंपनीवरील कर्ज फेडण्यासाठी सात वर्षांचा कालावधी लागला. त्यानंतर त्यांनी कंपनीचा विस्तारही केला. दोन युनिटचे आता पाच युनिट झाले आहेत. कच्च्या मालासाठी स्वतःची फाउंड्री सुरू केली. यामध्ये सध्या २०० कामगार कार्यरत आहेत. दररोज सुमारे ७५० मेट्रिक टनाचे उत्पादन होते. त्यांनी सन २००४ पासून उत्पादन एक्स्पोर्ट करण्यास सुरुवात केली. उत्पादनासाठी लागणारे आयएसओ, टीएस प्रमाणपत्रे मिळविली. सध्या कंपनीकडून अमेरिकेला सात ते आठ कंटेनर निर्यात केले जातात. अमेरिकेत त्यांच्याकडील या उत्पादनांचा वापर मायनिंगसाठी केला जातो. त्यासह देशभरातील चारचाकी वाहनांसाठी लागणाऱ्या सुट्या पार्ट‍्सची निर्मिती केली जाते.

विद्या या समाजातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवतात. त्यांनी अनेक महिलांना सीएनसी मशीनवर प्रशिक्षण दिले आहे. उद्योगक्षेत्रात महिलांसाठी उपलब्ध असलेल्या संधीची माहिती देतात. त्यांच्या दोन्ही मुलींनीही उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. मुलगी सिद्धी हिने मेकॅनिकल इंजिनीअरिंग शिक्षण पूर्ण झाले असून दुसरी मुलगी सृष्टी ही मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, आत्मविश्वास आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी उद्योगजगतात कर्त्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.

विविध पुरस्कार

विद्या यांना उद्योगश्री, उद्योगरत्न पुरस्कार, उद्योगजननी कमल पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय उद्योगरत्न पुरस्कार, नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सचा क्वालिटी ब्रॅचचा इंटर पिनर ऑफ दि इयर, रोटरी करवीर भूषण पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. सध्या कारखान्याची उलाढाल सुमारे ५० कोटींची आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज