शिवाजी पूल दिरंगाईप्रश्नी सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
राष्ट्रीय महामार्गच्या येथील कार्यालयातील कार्यकारी अभियंता विजय कांडगावे आणि उपअभियंता संपत आबदार यांच्यातील प्रशासकीय कामकाजातील टोकाच्या वादामुळे पर्यायी शिवाजी पुलाच्या पाया खोदाईचा अंतिम आराखडा ठेकेदारास मिळालेला नाही. त्यामुळे काम ठप्प झाले आहे. या प्रकरणात उपअभियंता आबदार जाणीवपूर्वक टाळाटाळ, हलगर्जीपणा करीत आहेत. त्यामुळे आबदार यांना सोमवारपर्यंत निलंबित करावे, अन्यथा मंगळवारी त्यांच्या कार्यालयास आणि कार्यकारी अभियंत्याच्या कक्षास कुलूप लावले जाईल, असा इशारा सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळातर्फे गुरूवारी देण्यात आला.
पर्यायी शिवाजी पुलाच्या उर्वरित कामाच्या पाया खोदाईचे काम सुरू होते. दरम्यान, महामार्ग प्रशासनाने पुढील पाया खोदाईसाठी अंतिम आराखड्यासाठी आवश्यक अहवाल उपअभियंता आबदार यांनी वेळेत दिला नाही. त्यामुळे पुन्हा काम रेंगाळले. त्यासंबंधीचा जाब कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला.
यावेळी बोलताना माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, 'पर्यायी शिवाजी पुलाचे काम करण्यास ठेकेदार तयार असताना अधिकारी अंतिम आराखडा देण्यास विलंब करीत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही आबदार टाळाटाळ करीत आहेत. त्यांना त्वरित निलंबित करावे. अन्यथा मंगळवारी उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयास कुलूप लावू.'
बाबा पार्टे म्हणाले, 'पर्यायी शिवाजी पुलाचे आताचे काम पावसामुळे पाणी वाढल्याने थांबले आहेत, असा लोकांचा समज आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या अंगात पाणी असल्यानेच काम रेंगाळल्याचे पुढे आले आहे. पाया खोदाईच्या अंतिम आराखड्यासाठी अहवाल देण्यास विलंब करणारे आबदार यांना हाकलून द्या. अन्यथा त्यांना कोल्हापुरची जनता धडा शिकवेल.' यावेळी जयकुमार शिंदे, किशोर घाटगे, तानाजी पाटील, दिलीप माने, विजयसिंह पाटील, रणजीत काकडे, कुमार खोराटे आदी उपस्थित होते.
---------------
चौकट
कोल्हापुरी भाषेत हिसका दाखवू
'पर्यायी शिवाजी पुलाचे काम पुन्हा रेंगाळल्याप्रकरणी कोल्हापुरी भाषेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना हिसका दाखवू', असा इशारा आर.के. पोवार यांनी दिला. त्यांनी अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे किती दिवस पुलाचे काम थांबणार, असा प्रश्न विचारत काडगांवे यांना धारेवर धरले. कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल आबदार यांच्याविरोधात शाहूपुरी पोलिसात फिर्याद दाखल करण्याचा इशाराही दिला.
-------------------
चौकट
उपअभियंता आबदार गायब
शिष्टमंडळ भेटण्यासाठी येणार असल्याचे कळताच उपअभियंता संपत आबदार गायब झाले. त्यामुळे पदाधिकारी संतप्त झाले. त्यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क झाला नाही. साहेब साईटवर गेल्याचे त्यांचे कनिष्ठ अधिकारी सांगत राहिले.
-----------------------
कोट
'पर्यायी शिवाजी पुलाच्या पाया खोदाईसाठी पहिल्यांदा उपअभियंता आबदार यांनी दिलेला अहवाल चुकीचा होता. सुधारित अहवाल देऊन अंतिम आराखडा ठेकेदारास देणे आवश्यक आहे. मात्र आबदार अहवाल देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यांना नोटीस दिली आहे. त्यांच्यावरील पुढील कारवाईसाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठविला आहे.
विजय कांडगावे, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग
-----------