अ‍ॅपशहर

मंदीतील वस्त्रोद्योगाला सावरा

मंदीच्या गर्तेत गटांगळ्या खात असलेला यंत्रमाग व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आला आहे. या यंत्रमाग व्यवसायाला नवसंजीवनी मिळावी यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येथील प्रांत कार्यालय चौकात यंत्रमागधारकांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे.

Maharashtra Times 28 Jul 2016, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम textile industry in problem
मंदीतील वस्त्रोद्योगाला सावरा


मंदीच्या गर्तेत गटांगळ्या खात असलेला यंत्रमाग व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आला आहे. या यंत्रमाग व्यवसायाला नवसंजीवनी मिळावी यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येथील प्रांत कार्यालय चौकात यंत्रमागधारकांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह कारखानदारांनी उत्स्फूर्त पाठींबा दर्शविला.

दोन वर्षांपासून वस्त्रोद्योग उद्योग मंदीत सापडला आहे. वीज दरातील अवाजवी वाढ, सूत दरातील चढ-उतार अन् कापडाला नसलेली मागणी यामुळे यंत्रमागधारक नुकसान सोसून व्यवसाय चालवित आहे. यंत्रमाग व्यवसायाला सरकारकडून मिळणाऱ्या सवलती कमी होत चालल्याने यंत्रमाग व्यवसाय बंद पडण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे. शहरात बहुतांशी यंत्रमागधारकांनी आठवड्यातून दोन-तीन पाळ्या बंद केल्या आहेत. या गर्तेतच हत्ती चौक परिसरातील यंत्रमागधारकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे सरकारने या व्यवसायाकडे गांभिर्याने लक्ष पुरवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. त्यातूनच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जीवन बरगे, अमोद म्हेतर, रामचंद्र हावळ, जनार्दन चौगुले, रावसाहेब तिप्पे, बाळकृष्ण लवटे, गणेश शहाणे, सचिन भुते व फारुक शिरगांवे यांनी बुधवारपासून प्रांत कार्यालय चौकात धरणे आंदोलन सुरु केले आहे. पाच दिवस हे आंदोलन सुरु राहणार असून यातूनही सरकारने लक्ष न दिल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


यंत्रमागधारकांच्या मागण्या ....

कर्नाटक व तामिळनाडूच्या धर्तीवर साध्या यंत्रमागासाठी प्रति युनिट एक रुपयाप्रमाणे वीज पुरवठा करावा, व्यवसायासाठी चार टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करावा, व्यवसायाला पोषक असे निर्यात धोरण राबवावे, यार्न बँक सुरु करुन लहान कारखानदारांना प्रोत्साहन द्यावे, सूत साठेबाजी व गैरप्रकारास आळा घालण्यासाठी सूत दर एक महिना स्थिर ठेवावेत, सूत व्यापाऱ्यांनी दैनंदिन सूत स्टॉक ऑनलाईन जाहीर करावा, यंत्रमाग महामंडळाकडून यंत्रमागधारकाला बीम पुरवठा करावा, खर्चीवाल्या यंत्रमागधारकांची मजुरी यंत्रमाग कामगाराबरोबरच ठरविली जावी, अन् त्यातील ट्रेडींगधारकांची अपप्रवृत्ती रोखावा आदी मागण्या यंत्रमागधारकांनी मांडल्या आहेत. या मागण्यांची पूर्तता झाल्यास संकटातील यंत्रमाग व्यवसायाला नवसंजीवनी मिळू शकेल. त्याचबरोबर कारखानदारांनी आपला व्यवसाय नुकसानीत न चालविता तो संयमाने चालवावे. शिवाय सूत व्यापाऱ्यांनीही कारखानदारांना वेठीस न धरता सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज