म. टा. वृत्तसेवा, गारगोटी
परतीच्या पावसाने भुदरगड तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भात कापणी हंगामातच पाऊस सुरू झाल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत. अचानक झालेल्या पावसाने बळीराजा मात्र चिंतेत सापडला असून भात पीक कापणी, मळणीच्या सुगीतच झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पावसाच्या माऱ्याने भात पिक भुईसपाट होऊन कष्टानं पिकवलेले पीक वाया जाण्याची वेळ आली असून गवताच्या गंज्या भिजल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. तालुक्यातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही उद्यापासून (बुधवार) सुरू करण्यात येणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
मंगळवारी गारगोटी म्हसवे मार्गे कूर मार्गावरील परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली असता बहुतांश भागात भाताचे पीक आडवे पडल्याचे निदर्शनास आले. त्यापुढील दारवाड, निळपण परिसरात जनावरांसाठी साठवणूक केलेल्या गवताच्या गंज्यांत पावसाचे पाणी घुसल्याने जनावरांच्या चाऱ्याचीचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यातूनही हाताला मिळेत ते घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसते. तालुक्यातील ऊस, सोयाबीन, नाचणा, भुईमुगासह अन्य पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी पिकांना कोंब फुटल्याचे दिसले. अतिवृष्टीतून वाचलेल्या डोंगर भागातील शेतीचे नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाने नुकसान केले आहे. अजूनही काही ठिकाणी वाफ्यात साचलेले पाणी आजही असल्याचे दिसते. काढणीला आलेले भात पीक पूर्णतः कोलमडले आहे. यंदा डोंगरी भागातील पिके फुलली होती. पण पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसात पिके उद्ध्वस्त झालीच पण जनावरांसाठी ठेवलेल्या गवताच्या गंजीत पाणी घुसल्याने गवतही खराब झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सर्वत्र पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू झाली असली तरी तालुक्यात मात्र उद्यापासून पंचनामे करण्यात येणार आहेत.