म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
माथाडी कायदा मोडीत काढण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाविरोधात जिल्ह्यातील हमालांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. त्यामुळे शेती उपन्न बाजार समितीतील गूळ, कांदा, बटाट्याचे व्यवहार ठप्प झाले. शहरातील लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, जयसिंगपूर, गांधीनगर, गडहिंग्लज, पेठवडगावसह बाजारपेठांमध्ये परिणाम जाणवला.
माथाडी कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली माथाडी मंडळे आणि माथाडी चळवळ नष्ट करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहे. याविरोधात राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने आंदोलन केले जाते. आज हमाल पंचायतीचे अध्यक्ष बाबा आढाव यांनी एक दिवस लाक्षणिक संप करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील तीन हजार हमाल संपात सहभागी झाल्याने व्यापारावर परिणाम झाला. बाजार समितीतील साडेसहाशे हमाल संपात सहभागी बसल्याने त्याचा फटका बाजार समितीला बसला. गूळ, कांदा, बटाट्याचे सौदे बंद ठेवण्यात आले. फळ भाजी मार्केट मात्र सुरू होते. लक्ष्मीपुरीतील धान्य बाजारवर परिणाम झाला. शाहूपुरी, रेल्वे गुड्स, ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांना संपाचा फटका बसला. धान्य, गूळ, साखरेचे व्यवहार पूर्ण थंडावले होते. जिल्हा हमाल पंचायतीचे पदाधिकारी मुंबईतील आझाद मैदानातील धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.
महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात मार्केट यार्डात निदर्शने केली. बाजार समितीचे संचालक बाबूराव खोत, युनियनचे विभागीय सचिव अमर शिंदे, उपाध्यक्ष आकाराम केसरी, दीपक पाटील, भिकाजी कात्रट आदींचा समावेश होता.