कोल्हापूर टाइम्स टीम
'ज्ञानामुळे मनुष्याचा विकास होतो, सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागतो. स्वत:सह संपूर्ण समाजाची उन्नती साधण्याची ताकत ज्ञानामध्ये आहे. ज्ञान, वाचन आणि चिंतन या माध्यमातून सत्याचा शोध लागतो' असा सूर वीरशैव लिंगायत समाजातर्फे आयोजित चर्चासत्रात उमटला. म्हैशाळकर महास्वामींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली. वीरशैव लिंगायत समाज, अक्कमहादेवी महिला मंडळ, संत शिरोमणी मन्मथ माऊली भक्त मंडळ, वीरशैव सिद्धांतामृत मासिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अक्कमहादेवी मंटप येथे कार्यक्रम झाला. दिवसभरात वेगवेगळ्या विषयावर चर्चासत्रे झाली.
म्हैशाळकर महास्वामी म्हणाले, 'स्त्री पुरुष समानतेचा आविष्कार वीरशैव धर्मात अनादीकालापासून स्पष्टपणे दिसून येतो. वीरशैव धर्मांत महिलांना सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात समसमान स्थान दिले आहे.'
वीरशैव को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र लकडे यांनी ज्ञानाचे महत्व पटवून दिले. महात्मा बसवेश्वर व लिंगायत चळवळ याविषयावरील चर्चासत्रात तज्ज्ञांनी सहभाग घेतला. वीरशैव शब्दाची उत्पत्ती, महिलांचे सामाजिक स्थान, साहित्य आणि सांस्कृतिक परंपरा अशा विविध विषयांवर ऊहापोह झाला. चर्चेत बी. एस. स्वामी, शांतीतीर्थ स्वामी, प्रा. उमाकांत शेटे, डॉ. शोभा कराळे, मीनाक्षी हिरेमठ, विजय स्वामी, शशिकांत दुर्गुळे, अपर्णा जिरवणकर, शिवशंकर उपासे, राजा शिरगुप्पे यांनी सहभाग घेतला. वसंतराव सांगवडेकर यांनी प्रास्ताविक केले. राजू वाली यांनी स्वागत केले. सुमन वडगावकर यांनी आभार मानले. वीरशैव बँकेचे अध्यक्ष महादेव साखरे, समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे, नानासाहेब नवरे, राजशेखर तंबाखे, चंद्रशेखर बटकडली आदी उपस्थित होते.