म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'एक वर्षापेक्षा अधिक काळ अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती करा,' असे स्पष्ट आदेश विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी जिल्हा परिषदेतील आढावा बैठकीत दिले. तसेच पंचायत समितीच्या बैठकीकडे पाठ फिरविणाऱ्या खातेप्रमुखांची त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली. शिक्षण व आरोग्य विभागाची दैनंदिन कामकाज अहवालाची तपासणी करत पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयाकडून २०१६-१७ मध्ये जिल्हा परिषदेतील विविध विभागांची तपासणी केली होती. त्या तपासणीच्या आधारे आतापर्यंतच्या कामाच्या अहवाल वाचनाची बैठक बुधवारी झाली. १८९ त्रुटीपैकी ३२ मुद्यांचा आढावा घेतला. कालबध्द पदोन्नती, निवृत्तिवेतन, बिंदू नामावली, स्वच्छता अभियान, मागासवर्गीय घटकांच्या उन्नतीच्या योजना, समाजकल्याण विभाग व पाणी स्वच्छता विभागाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. साथीच्या रोगांवरील प्रतिबंधात्मक उपाय व स्त्री-भ्रूणहत्या प्रतिबंधात्मक योजना सक्षमपणे राबविण्याच्या सूचना केल्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांनी जि.प.मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली.
जिल्हा परिषद व संलग्न कार्यालयांकडे विनापरवाना गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामकाजावर परिणाम होत आहे. त्याची गभीर दखल घेत डॉ. म्हैसेकर म्हणाले, 'कामावर न दिसणाऱ्या गायब कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना तत्काळ सेवेतून कमी करावे. तसेच जे कर्मचारी दीर्घ कालावधीनंतर हजर झाले असतील तर त्यांचा पूर्वीचा सेवाकाल संपुष्टात आणावा व नव्याने नियुक्तीचा कालावधी निश्चित करावयाच्या सरकारी निर्णयाच्या अंमलबजावणी करावी.'
००००
शिरोळ, हातकणंगलेवर लक्ष
निर्मलग्राम योजनेत शिरोळ व हातकणंगले तालुक्यांची कामगिरी समाधानकारक नाही. स्वच्छ भारत योजनेंतर्गत या तालुक्यांत निर्मलग्राम योजना यशस्वी करावी आणि त्या संदर्भातील अहवाल पंधरा दिवसात विभागीय आयुक्त कार्यालयांना सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना केल्या. तसेच बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अपूर्ण कामांचा आढावा घेतला. दरम्यान, वर्कशीट तपासताना एका कर्मचाऱ्याच्या नोंदीमध्ये त्रुटी आढळल्याने वेतनवाढ थांबविण्याची कारवाई का करू नये, अशी विचारणा अधिकाऱ्यांना केली. ग्रामनिधीतील ४६ लाख २५ हजार रुपयांच्या अपहारापैकी २६ लाख रुपयांची वसुली झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. चौदाव्या वित्त आयोगातील निधी शंभर टक्के खर्ची पडायलाच हवा, अशी सक्त सूचना त्यांनी केली.
०००
चार कर्मचाऱ्यांवर कारवाई
जिल्हा परिषद प्रशासनाने सातत्याने गैरहजर राहिलेल्या चार कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये शिक्षणसेवक किशोर पारूडकर, आरोग्यसेवक सुरेश कृष्णा कुंभार, ग्रामसेविका अर्चना नरळे, परिचय सतीश गव्हाणे यांचा समावेश आहे.