लोगो : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
कोल्हापूर टाइम्स टीम
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी रंगनाथ पठारे समितीने २०१३ मध्ये केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला. सात वर्षे उलटूनही या प्रस्तावावर केंद्र सरकारने निर्णय घेतलेला नाही. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेला आला असून, यंदा तरी या कामाला मुहूर्त लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळावा, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. हा दर्जा मिळाल्यास राष्ट्रीय पातळीवर मराठी भाषेचे प्राचीनत्व, वाङ्मयीन श्रेष्ठत्व आणि भाषिक व्यवहाराचे महत्त्व सिद्ध होणार आहे. मराठी भाषेचा इतिहास आणि प्राचीन वाङ्मयाच्या आधारावर अभिजात दर्जा मिळावा, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. यासाठी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अभ्यास करून अहवाल तयार केला. हा अहवाल २०१३ मध्ये केंद्र सरकारला सादर केला आहे. केंद्र सरकारने हा प्रस्ताव साहित्य अकादमीकडे पाठवला होता. साहित्य अकादमीच्या तज्ज्ञ समितीनेही यावर अभिप्राय दिला आहे. मात्र, केंद्र सरकारने यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. केंद्र सरकारची चालढकल सुरू असल्याने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करावा, असा पत्रव्यवहार पठारे यांनी अनेकदा केला आहे. यानंतरही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत नसल्याने मराठी भाषिकांसह साहित्यिक, अभ्यासकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
अभिजात दर्जा देण्यासाठी आवश्यक असलेले सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करते, असा रंगनाथ पठारे समितीचा दावा आहे. मराठी भाषेला हजारो वर्षांचा इतिहास आहे. या भाषेतील वाङ्मयीन कलाकृती दर्जेदार आहेत. साहित्य अकादमीसह अन्य पुरस्कारांवरही मराठीतील अनेक कलाकृतींनी आपली मोहोर उमटवली आहे. प्राचीन मराठी आणि सध्याच्या मराठी भाषेचा गाभाही एकच आहे. म्हणी, वाक्यप्रचार, भाषिक रचना, अर्थछटा, दळणवळणाचे सामर्थ्य ही मराठी भाषेची शब्दसंपदा आहे. ज्ञानभाषा म्हणूनही ती आपली उपयुक्तता स्पष्ट करीत आहे. आज देश-विदेशातील अनेक भाषांनी मराठी शब्द स्वीकारले आहेत. यामुळे मराठीला अभिजात दर्जा देण्यास केंद्र सरकारने विलंब लावू नये, अशी अपेक्षा मराठी भाषिकांकडून व्यक्त केली जात आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यास तिच्या संवर्धनासाठी मदत होईल. अन्य भाषांच्या आक्रमणातही मराठीने आपले वैभव टिकवून ठेवले आहे. सोशल मीडियातही तिचा वापर वाढत आहे. आभिजात दर्जामुळे भाषेचे वैभव आणखी वाढेल.
- प्रा. डॉ. दत्ता पाटील, अध्यक्ष, मराठी भाषा अभ्यास मंडळ, शिवाजी विद्यापीठ