Sachin.patil1@timesgroup.com
Tweet@sachinpMT
कोल्हापूर : आपल्याच फार्मास्युटिकल कंपनीची औषधे डॉक्टरांनी वापरावीत, यासाठी औषध कंपन्यांचे प्रतिनिधी डॉक्टरांना वेगवेगळी आमिषे दाखवत असल्याच्या तक्रारी सरकारला मिळाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मार्केटिंगबाबतच्या होणाऱ्या अनैतिक गोष्टींना पायबंद घालावा यासाठी डॉक्टरांसाठी आचारसंहिता बनवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे भेटवस्तू, प्रवास सुविधा, आलिशान ठिकाणी मुक्काम तसेच फार्मास्युटिकल आणि संबंधित आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांकडून रोख रक्कम घेण्यावर निर्बंध येणार आहेत. दोषी डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
देशात औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यामध्ये वाढ झाली आहे. दिवसेंदिवस फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढत आहे. औषधांचा खप वाढावा या हेतूने मार्केटिंगचे विविध फंडे वापरून डॉक्टरांना आपल्या कंपनीकडे खेचण्याची स्पर्धा चालू आहे. यासाठी खास प्रशिक्षित प्रतिनिधींची नेमणूक करण्यात येते आहे. डॉक्टरांनी आपल्या कंपनीची औषधे रुग्णांना लिहून द्यावीत, यासाठी औषध कंपन्यांचे प्रतिनिधी डॉक्टरांची भेट घेऊन विविध आजारांवरील औषधांची माहिती प्रात्यक्षिकासह दाखवतात. तसेच भेटीदरम्यान काही औषधे प्रायोगिक तत्वावर डॉक्टरांना दिली जातात. डॉक्टरांनी आपल्या कंपनीच्या औषधांचा वापर सातत्याने सुरू करावा, यासाठी त्यांना गळ घातली जाते. प्रसंगी महागड्या भेटवस्तू डॉक्टरांना दिल्या जातात. यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंचाही समावेश असतो. ठराविक औषधांचा कोटा पूर्ण केल्यानंतर डॉक्टरांना परदेशवारी घडवली जाते. तसेच विविध लकी ड्रॉ माध्यमातून डॉक्टरांना भुरळ पाडली जाते. मध्यंतरी कोल्हापुरातील एका नामवंत डॉक्टरांनी हॉस्पिटलचा वरचा मजला बांधून दिल्यास ठराविक कंपनीची औषधे वापरतो, असे एका कंपनीच्या प्रतिनिधींना सांगितल्याचे समजते. काही विशिष्ट औषध कंपन्यांशी ठराविक डॉक्टरांनी हितसंबंध ठेवल्याने त्याचा त्यांना आर्थिक फायदा झाला आहे. त्यामुळे रुग्णाला औषधे देताना ठराविक कंपनीची लिहून दिली जातात. तसेच त्याच कंपनीची औषधे घेतल्यास गुण येईल, असे रुग्णाला सांगितले जाते.
तक्रारी वैद्यकीय परिषदेकडे
चुकीच्या कृत्यांना पायबंद घालण्यासाठी डॉक्टरांवर आचारसंहितेच्या माध्यमातून सरकार नजर ठेवणार आहे. भारतीय मेडिकल काउन्सिल (व्यावसायिक आचारसंहिता, शिष्टाचार व नैतिकता) नियमन, २००२ नुसार फार्मास्युटिकल आणि संबंधित क्षेत्रातील उद्योगांशी आर्थिक हितसंबंध ठेवण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. डॉक्टरांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया व राज्य वैद्यकीय परिषदेला असणार आहे. औषध कंपन्याकडून डॉक्टरांना भेटवस्तू दिल्या जात असल्याच्या तक्रारी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाकडे करण्यात आल्या होत्या. त्या तक्रारी राज्य वैद्यकीय परिषदेकडे पाठवण्यात आल्या असून त्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
कंपन्यांमधील जीवघेण्या स्पर्धेमुळे हे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अशा स्पर्धेवर आळा घातला पाहिजे. भारतीय मेडिकल काउन्सिलच्या नियमासह व्यावसायिक नीतिमूल्यांचा विचार डॉक्टर व औषध कंपन्यांनी केला पाहिजे. चुकीच्या कृत्यांबाबत डॉक्टरांसह औषध कंपन्यांना देखील जबाबदार धरले जावे. त्यानंतर डॉक्टरांवर कारवाई केली पाहिजे.
कैलास तांदळे, अध्यक्ष महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशन
Tweet@sachinpMT
कोल्हापूर : आपल्याच फार्मास्युटिकल कंपनीची औषधे डॉक्टरांनी वापरावीत, यासाठी औषध कंपन्यांचे प्रतिनिधी डॉक्टरांना वेगवेगळी आमिषे दाखवत असल्याच्या तक्रारी सरकारला मिळाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मार्केटिंगबाबतच्या होणाऱ्या अनैतिक गोष्टींना पायबंद घालावा यासाठी डॉक्टरांसाठी आचारसंहिता बनवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे भेटवस्तू, प्रवास सुविधा, आलिशान ठिकाणी मुक्काम तसेच फार्मास्युटिकल आणि संबंधित आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांकडून रोख रक्कम घेण्यावर निर्बंध येणार आहेत. दोषी डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
देशात औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यामध्ये वाढ झाली आहे. दिवसेंदिवस फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढत आहे. औषधांचा खप वाढावा या हेतूने मार्केटिंगचे विविध फंडे वापरून डॉक्टरांना आपल्या कंपनीकडे खेचण्याची स्पर्धा चालू आहे. यासाठी खास प्रशिक्षित प्रतिनिधींची नेमणूक करण्यात येते आहे. डॉक्टरांनी आपल्या कंपनीची औषधे रुग्णांना लिहून द्यावीत, यासाठी औषध कंपन्यांचे प्रतिनिधी डॉक्टरांची भेट घेऊन विविध आजारांवरील औषधांची माहिती प्रात्यक्षिकासह दाखवतात. तसेच भेटीदरम्यान काही औषधे प्रायोगिक तत्वावर डॉक्टरांना दिली जातात. डॉक्टरांनी आपल्या कंपनीच्या औषधांचा वापर सातत्याने सुरू करावा, यासाठी त्यांना गळ घातली जाते. प्रसंगी महागड्या भेटवस्तू डॉक्टरांना दिल्या जातात. यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंचाही समावेश असतो. ठराविक औषधांचा कोटा पूर्ण केल्यानंतर डॉक्टरांना परदेशवारी घडवली जाते. तसेच विविध लकी ड्रॉ माध्यमातून डॉक्टरांना भुरळ पाडली जाते. मध्यंतरी कोल्हापुरातील एका नामवंत डॉक्टरांनी हॉस्पिटलचा वरचा मजला बांधून दिल्यास ठराविक कंपनीची औषधे वापरतो, असे एका कंपनीच्या प्रतिनिधींना सांगितल्याचे समजते. काही विशिष्ट औषध कंपन्यांशी ठराविक डॉक्टरांनी हितसंबंध ठेवल्याने त्याचा त्यांना आर्थिक फायदा झाला आहे. त्यामुळे रुग्णाला औषधे देताना ठराविक कंपनीची लिहून दिली जातात. तसेच त्याच कंपनीची औषधे घेतल्यास गुण येईल, असे रुग्णाला सांगितले जाते.
तक्रारी वैद्यकीय परिषदेकडे
चुकीच्या कृत्यांना पायबंद घालण्यासाठी डॉक्टरांवर आचारसंहितेच्या माध्यमातून सरकार नजर ठेवणार आहे. भारतीय मेडिकल काउन्सिल (व्यावसायिक आचारसंहिता, शिष्टाचार व नैतिकता) नियमन, २००२ नुसार फार्मास्युटिकल आणि संबंधित क्षेत्रातील उद्योगांशी आर्थिक हितसंबंध ठेवण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. डॉक्टरांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया व राज्य वैद्यकीय परिषदेला असणार आहे. औषध कंपन्याकडून डॉक्टरांना भेटवस्तू दिल्या जात असल्याच्या तक्रारी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाकडे करण्यात आल्या होत्या. त्या तक्रारी राज्य वैद्यकीय परिषदेकडे पाठवण्यात आल्या असून त्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
कंपन्यांमधील जीवघेण्या स्पर्धेमुळे हे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अशा स्पर्धेवर आळा घातला पाहिजे. भारतीय मेडिकल काउन्सिलच्या नियमासह व्यावसायिक नीतिमूल्यांचा विचार डॉक्टर व औषध कंपन्यांनी केला पाहिजे. चुकीच्या कृत्यांबाबत डॉक्टरांसह औषध कंपन्यांना देखील जबाबदार धरले जावे. त्यानंतर डॉक्टरांवर कारवाई केली पाहिजे.
कैलास तांदळे, अध्यक्ष महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशन