जिल्ह्यात ५० मार्गांवर पाणी
वाहतूक विस्कळीत, एसटीच्या फेऱ्यांवर परिणाम
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
गेल्या आठवड्याभरातील जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील ५० मार्ग पाण्याखाली गेले आहेत. यात रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासह कोकणात जाणाऱ्या गगनबावडा या राज्य मार्गाचाही समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हा परिषदेकडील २० जिल्हा मार्ग बंद आहेत. याचा परिणाम वाहतुकीवर झाला असून, एसटी प्रशासनाने अनेक ठिकाणी वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवली आहे.
जिल्ह्यात गेल्या चार दिवसात पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी शहरात काही प्रमाणात जोर कमी झाला असला तरी, धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे. पंचगंगा नदी धोका पातळीवर आहे, तर इतरही नद्या पात्राबाहेर पडल्याने नद्यांच्या काठांवरील शेती पाण्याखाली गेली आहे. जिल्ह्यातील १२३ बंधाऱ्यांपैकी ८५ बंधारे पाण्याखाली आले आहेत. रस्त्यांवर सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कोल्हापूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर रजपूतवाडीजवळ पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीला बंद केला आहे. शाहूवाडीकडून येणारी वाहतूक बोरपाडळेमार्गे पुणे-बेंगळुरू महामार्गावर वळवली. रत्नागिरीकडे जाणारी वाहतूकही बारपाडळेमार्गे सुरू आहे. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या आदेशाने शिवाजी पुलावरील वाहतूक बंद केली असून, या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर टेकवाडीजवळ पाणी आल्याने कोकणात उतरणारा हा महत्त्वाचा मार्ग बंद आहे. गगनबावडामार्गे कोल्हापूरला येणारी वाहतूक राधानगरीमार्गे वळवण्यात आली आहे. कळे येथे पाणी आल्याने बाजारभोगावला जाणारी वाहतूक बंद आहे. भडगाव पुलावर पाणी असल्याने गडहिंग्लजमधून नेसरी, चंदगडला जाणारी वाहतूक आजरामार्गे वळवली आहे. चंदगड ते आजरा मार्गावरील वाहतूक दोन्हीकडून गवसे पुलापर्यंत सुरू आहे. कुरुंदवाड डेपोतून जाणाऱ्या पणजी आणि खारेपाटण या गाड्या रद्द केल्या आहेत, तर कागल ते इचलकरंजी मार्गावरील दोन्हीकडील वाहतूक हुपरीपर्यंत सुरू आहे. पणजी आणि खारेपाटण येथे जाणाऱ्या बस वगळता इतर सर्व बस फेऱ्या अंशत: आणि पर्यायी मार्गाने सुरू असल्याची माहिती एसटीचे सांख्यिकी अधिकारी एस. एस. कुमठेकर यांनी दिली. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवल्याने प्रवाशांची सोय झाली असली तरी, आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
चौकट
गगनबावडा डेपोला सर्वाधिक फटका
गगनबावडा डेपोतून कोल्हापूर आणि कोकण या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. टेकवाडीजवळ रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णत: बंद आहे. गगनबावडा तालुक्यात अंतर्गत मार्गही पाण्याखाली आहेत, त्यामुळे या डेपोतील ९० टक्के बससेवा बंद आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
चौकट
पाण्याखालील मार्ग
सार्वजनिक बांधकाम विभागाकडील मार्ग
राष्ट्रीय महामार्ग - १
राज्य मार्ग - ९
प्रमुख जिल्हा मार्ग - १४
जिल्हा परिषदेकडील मार्ग
ग्रामीण मार्ग - ११
इतर जिल्हा मार्ग - १५