म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
ऑगस्ट महिन्यात आलेल्या जिल्ह्यातील महापुराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने मंगळवारी बाधीत भागात अभ्यास दौरा केला. त्यानंतर सर्किट हाउस येथे झालेल्या बैठक झाली. भविष्यात महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टीमधील विसर्गावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र, कर्नाटकातील अधिकाऱ्यांची सक्षम समिती नियुक्त करण्याची शिफारस सरकारकडे करण्यासंबंधी बैठकीत चर्चा झाली.
समितीचे अध्यक्ष आणि जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव नंदकुमार वडनेरे, जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांच्यासह विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई बैठकीला उपस्थित होते.
सकाळी ११ च्या सुमारास दाखल झालेल्या समितीने शिरोळ तालुक्यातील किटवाड, तेरवाड, राजापूर, नृसिंहवाडी आणि कुरूंदवाड येथे नदीघाटाची पाहणी केली. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाहणी केली.
त्यानंतर झालेल्या बैठकीत ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाची माहिती जिल्हाधिकारी देसाई यांनी दिली. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर जिल्ह्यातील प्रमुख धरणे दहा टक्के रिकामी ठेवण्याचे सूचित केल्याचे सांगितले. यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याने उन्हाळ्यातील पाण्याच्या मागणीसाठी धरण भरून घेणे आवश्यक होते, असे स्पष्ट केले. शंभर वर्षांत सरासरीपेक्षा सर्वाधिक पाऊस पडला. धरण आणि खुल्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढली. धरणातील पाण्याच्या विसर्गाची अद्याप सुरू असलेली पारंपरिक पद्धत, अलमट्टी धरणातील पाण्याचा फुगवटा अशी प्राथमिक कारणे महापूर गंभीर होण्यास कारण ठरल्याचे समितीच्या निदर्शनास आणून दिले.
-------
महापुराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी दिवसभर बाधीत भागात अभ्यास दौरा केला. कमी कालावधीत सर्वाधिक पडलेल्या पावसामुळे महापुरात भर पडल्याचे निदर्शनास आले. समिती सदस्यांनी यासंबंधी नोंदवलेल्या मुद्यांची चर्चा होईल. त्यानंतर समिती नोंदवलेल्या उपाययोजनांवर एकमत झाल्यानंतर पुराची कारणे आणि उपाययोजनासंबंधीच्या शिफारसीचा अहवाल सरकारला दिला जाईल. जवळपास तीन महिन्यांत अहवाल पाठवण्यात येईल.
नंदकुमार वडनेरे, अध्यक्ष, अभ्यास समिती
-------