म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे करवीर तालुक्यात शेतीचे, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याची नुकसानभरपाई अनुदान पुढील आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यावर बँकेमार्फत जमा होईल, अशी माहिती करवीर तहसिलदार शीतल मुळे-भामरे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
जुलै-ऑगस्टमध्ये झालेली अतिवृष्टी, संततधार पाऊस व पुरामुळे करवीर तालुक्यातील घरे, गोठे, दुकान व्यावसायिकांचे फार मोठे नुकसान झाले. त्यांना सानुग्रह अनुदान, निर्वाह भत्ता, पूर्णत: पडलेल्या घरांच्या मालकांना निवारा भाडे, गोठा, कारागीर, दुकानदार, व्यावसायिक, मृत जनावरे, बेपत्ता जनावरांबाबतचे अनुदान बँकेमार्फत जमा केले आहे. हे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पुढील आठवड्यात जमा होणार आहे. नुकसानग्रस्त लाभार्थ्यांची यादी संबंधित गावचे तलाठी व ग्रामसेवकांकडे देण्यात आली आहे. याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास संबंधित गावच्या तलाठ्यांकडे संपर्क साधावा, असे आवाहनही तहसिलदारांनी केले आहे.