अ‍ॅपशहर

...आणि एक चांगला उपक्रम थांबला

ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र जमावे, त्यांच्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम करावेत, मार्गदर्शन करावे, या उद्देशाने सुरू झालेला कुर्ला पश्चिमेकडील ज्येष्ठ नागरिक संघ बंद करण्याची वेळ पदाधिकाऱ्यांवर आली आहे. काही मोजके कार्यकर्ते वगळले, तर उर्वरित सभासदांच्या उदासीनतेमुळे हा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागला,

Maharashtra Times 6 Aug 2018, 10:08 am
rutuja.sawant@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम upakram


मुंबई :

ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र जमावे, त्यांच्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम करावेत, मार्गदर्शन करावे, या उद्देशाने सुरू झालेला कुर्ला पश्चिमेकडील ज्येष्ठ नागरिक संघ बंद करण्याची वेळ पदाधिकाऱ्यांवर आली आहे. काही मोजके कार्यकर्ते वगळले, तर उर्वरित सभासदांच्या उदासीनतेमुळे हा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागला, असे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेले कुर्ल्याचे गांधी मैदान वाचवण्यासाठीचा लढा गाजला होता. यासाठी या ज्येष्ठ नागरिक संघाने पुढाकार घेतला होता. इतर मंडळांना एकत्र करून एकीने त्यांनी 'मैदान बचाव'चा नारा दिला. यासाठी कायदेशीर मार्गाने ते लढले आणि मैदान मोकळे करण्यात प्रशासनाला भाग पाडले. याशिवाय संघटनेने फेरीवाले, परिसरातील बकालपणा, पाण्याचा अपव्यय, यांसारखे नागरी प्रश्नही मांडले. शिवाय संघातर्फे मकरसंक्रांत साजरी केली जात असे. व्याख्यान, मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येत होते. परंतु हळूहळू १०० सभासद असलेल्या या संघाचा मूळ उद्देश पूर्ण होत नसल्याचे पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. पदाधिकारी आणि कार्यकारी मंडळाचे ११ ते १२ जण सोडले तर अन्य सभासद संघासाठी काम करण्यात पुढाकार घेत नव्हते. याबाबत पदाधिकाऱ्यांनी विविध मार्गांनी परिस्थिती बदलण्याचा, सभासदांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही, असे ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव अण्णा प्रभूदेसाई यांनी सांगितले.

संघाची स्थापना १९९९मध्ये झाली. नोंदणी २०००मध्ये झाली. हा संघ फेसकॉमशी संलग्न होता, परंतु आता अध्यक्ष, खजिनदारांचे वय ८५पेक्षा अधिक आहे. माझे वयही ८४ आहे. शेवटचे काही महिने एकट्याने काम सांभाळले. परंतु केवळ कागदोपत्री राहणाऱ्या संस्थांपैकी एक आम्हाला व्हायचे नव्हते. म्हणून संघ बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असेही प्रभूदेसाई म्हणाले. संघ बंद करताना संस्थेच्या वस्तू एका शाळेला देण्यात आल्या. काही देणगी दिली. उर्वरित पैसे फेसकॉमला देणगी म्हणून देण्यात आले, अशी माहितीही त्यांनी दिली. ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन झाल्यानंतर काही वर्षांनी इतरही ज्येष्ठांचे संघ परिसरात स्थापन झाले होते. परंतु तेही बंद पडले आहेत.

अशा उपक्रमांसाठी वेळ काढावा लागतो. माणसे तयार करावी लागतात. फेसकॉमतर्फे ज्येष्ठ नागरिक संघांना मार्गदर्शन करण्यात येते. आता आम्ही विविध उद्देशाने चार गट तयार केले आहेत. यात सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक कार्यक्रम यासाठीही गट तयार करण्यात आले आहेत. यामार्फत विविध कार्यक्रम घेऊन आम्ही प्रोत्साहन देतो. ज्येष्ठ नागरिक संघात नवीन माणसे येत नाहीत. ती येण्यासाठी नवे नियम करावे लागतील. फेसकॉममध्ये एका व्यक्तीला दोनपेक्षा अधिक वेळा त्या पदावर राहता येत नाही. प्रत्येक संस्थेने असे केले पाहिजे. यामुळे प्रत्येकाला संधी मिळेल आणि नवीन फळी तयार होईल.

- विजय औंधे, अध्यक्ष, मुंबई प्रादेशिक विभाग

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज