म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणात निकाल आल्यानंतर भावना भडकाविणारे, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अशा प्रकारच्या सुमारे १५० पोस्ट आणि संकेतस्थळे महाराष्ट्र सायबर सुरक्षा विभागाने ब्लॉक केल्या आहेत. देशाच्या विविध भागांबरोबरच पाकिस्तानमधूनही हे वादग्रस्त संदेश येत असल्याचे समोर आले आहे.
विधानसभा निवडणुकांदरम्यान महाराष्ट्र सायबरने तब्बल पाचशे आक्षेपार्ह पोस्ट ब्लॉक केल्या होत्या. तेच आव्हान अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणाच्या निकालादरम्यान होते. यावेळीही महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सोशल माध्यमांवर बारीक नजर ठेवली होती. समाजात तेढ पसरेल त्याचप्रमाणे अफवा पसरून कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशा पोस्ट व्हायरल करू नका, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले होते. त्याचाच परिणाम निकालाच्या दिवशी दिसून आला. मात्र त्यानंतर या निकालाच्या विरोधात संकेतस्थळ, सोशल मीडियावरून पोस्ट व्हायरल केल्या जाऊ लागल्या. अशा वादग्रस्त पोस्टना तत्काळ अटकाव करण्यात आला.