म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील सर्व पुलांचा फेरआढावा घेऊन आवश्यक असल्यास पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू य़ांनी दिले आहे.
एल्फिन्स्टन रोड, अंधेरीचा गोखले पूल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबईतील ३१४ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यात धोकादायक पुलांची दुरुस्ती व पुनर्बांधणीचे काम पालिकेने हाती घेतले आहे. पादचारी आणि रेल्वे पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर त्यात २९ पूल अतिधोकादायक असल्याचे समोर आले होते. या अहवालात अनेक पुलांची दुरुस्तीही सुचवण्यात आली. तर अतिधोकादायक पूल पाडण्यात आले आहेत. मात्र काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहेत. तर काही पुलांची कामे स्ट्रक्चरल ऑडिटनंतरही हाती घेण्यात आलेली नाही. सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी दादर येथील टिळक पुलाच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न हरकतीचा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
टिळक पूल पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाची दुरुस्ती कधी होणार की याही पुलाचे हिमालय करणार, असा सवाल करून काही पुलांची दुरुस्ती रखडली आहे. लोअर परळ येथील पुलाचे काम दोन वर्षांपासून रखडले आहे. हाती घेण्यात आलेल्या पुलांचे काम धीम्या गतीने सुरू आहे, असे भाजपच्या नगरसेविका राजश्री शिरवडकर यांनी सांगितले. त्यावर अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी लवकरच सर्व पुलांची पाहणी करून फेरआढावा घेतला जाईल, असे स्पष्ट केले.