अ‍ॅपशहर

‘शौर्या’ला एव्हरेस्टचे आव्हान!

जगभरातील गिर्यारोहकांना ज्याची भुरळ पडते, काठिण्याचा सामना करत देशोदेशीचे दिग्गज ज्या स्वप्नाचा पुन्हापुन्हा पाठपुरावा करतात, त्या एव्हरेस्ट मोहिमेवर चढाई करण्याचे आव्हान चंद्रपूरच्या आदिवासी आश्रमशाळेतील १० विद्यार्थ्यांनी स्वीकारले आहे! दहा जणांचा एक चमू जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याच्या मोहिमेवर परवा, बुधवारी निघणार आहे. आदिवासी विभागाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेचे नाव आहे 'मिशन शौर्य'!

Maharashtra Times 9 Apr 2018, 9:27 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम everest


जगभरातील गिर्यारोहकांना ज्याची भुरळ पडते, काठिण्याचा सामना करत देशोदेशीचे दिग्गज ज्या स्वप्नाचा पुन्हापुन्हा पाठपुरावा करतात, त्या एव्हरेस्ट मोहिमेवर चढाई करण्याचे आव्हान चंद्रपूरच्या आदिवासी आश्रमशाळेतील १० विद्यार्थ्यांनी स्वीकारले आहे! दहा जणांचा एक चमू जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याच्या मोहिमेवर परवा, बुधवारी निघणार आहे. आदिवासी विभागाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेचे नाव आहे 'मिशन शौर्य'!

व्यक्तिमत्त्व विकासासाठी आत्मविश्वास हा महत्त्वाचा घटक आहे आणि साहसी खेळातून तो वाढविण्यास मदत होते,या दृष्टिकोनातून आदिवासी आश्रमशाळांमधील शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त व मानसिकदृष्ट्या कणखर अशा १७ ते २१ वयोगटातील विद्यार्थ्यांनाया मोहिमेसाठी पाठविण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर व जिल्हा प्रशासन, चंद्रपूर यांच्या सहयोगाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

या प्रकल्पाची सुरुवात जुलै २०१७मध्ये झाली. आश्रमशाळांमधील ६० इच्छुक मुलांची प्राथमिक चाचणी करण्यात आली. त्यातून ४५ विद्यार्थ्यांना निवडून पायाभूत प्रशिक्षणासाठी वर्धा येथे पाठविण्यात आले. तेथे विविध चाचण्यांमधून २५ मुलांची भोनगीर, हैदराबाद येथील प्राथमिक रॉक क्लायंबिंग कोर्ससाठी निवड करण्यात आली. सप्टेंबर, २०१७मध्ये झालेल्या या पाच दिवसीय कोर्समधून १८ विद्यार्थ्यांची पुढील प्रशिक्षणासाठी निवड झाली. या १८ विद्यार्थ्यांना प्राथमिक गिर्यारोहण कोर्ससाठी नोव्हेंबर, २०१७मध्ये दार्जिलिंगला पाठविण्यात आले. या १८ पैकी १३ विद्यार्थ्यांची निवड जानेवारी, २०१८मध्ये लेह-लडाख येथील १२ दिवसीय हिवाळी गिर्यारोहण कोर्ससाठी करण्यात आली.

लडाख येथे ट्रेक व शारीरिक प्रशिक्षणाशिवाय तेथील परिस्थितीशी जुळवून घेण्याचे प्रशिक्षणही त्यांना देण्यात आले. यादरम्यान विद्यार्थ्यांनी १७ हजार फूट उंचीवर चढाई केली. या काळात विद्यार्थ्यांच्या पालकांची आवश्यक त्या सर्व वेळी परवानगी घेण्यात आली होतीच, शिवाय त्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होणार नाही याचीही काळजी घेतली गेली.

'शौर्य'वीर आणि वीरांगना!

या चमूमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील बोरडा, देवडा व जिवती तालुक्यातील आदिवासी कुटुंबांतील मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, आकाश मडवी, आकाश अत्राम, शुभम पेंदोर, कविदास कातमोडे, विकास सोयाम, इंदू कन्नाके, छाया अत्राम या मुला-मुलींचा समावेश आहे.

>>आज मुंबईत

मोहिमेच्या ह्या अंतिम टप्प्यासाठी त्यांच्याबरोबर सपोर्ट स्टाफ व व्यवस्थापकांबरोबरच १५ शेर्पा, एक तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होतील. या सर्व गिर्यारोहकांचा विमा उतरविण्यात आला आहे. माऊंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करण्यासाठी या मुलांना शुभेच्छा देण्यासाठी रविवारी चंद्रपूरमध्ये एक कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. या दहा तरुण नायकांचे आज, सोमवारी ९ एप्रिल रोजी मुंबईत आगमन होईल. परवा, बुधवारी ११ एप्रिल रोजी १० विद्यार्थ्यांचा हा गट काठमांडूला प्रयाण करणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज