अ‍ॅपशहर

मुंबईतील म्हाडाच्या वसाहतीत धक्कादायक चित्र; १७ इमारती धोकादायक, रहिवासी मृत्यू सावटाखाली!

Mumbai News : घरातील स्लॅब आणि छताचा भाग कोसळणे, तसेच प्लास्टर निखळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या इमारतींची देखभाल म्हाडातर्फे नियमित करण्यात येत नसल्याने त्या जीर्ण झाल्या आहेत, अशी माहिती रहिवाशांकडून देण्यात आली.

Authored byनितीन चव्हाण | Edited byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Oct 2023, 7:45 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : सर्व इमारतींमध्ये पाण्याची गळती, स्लब कोसळणे, भिंतींना तडे, प्लास्टर निघणे, टेरेसची पडझड... हे चित्र आहे अंधेरी पूर्वेकडील म्हाडाच्या पीएमजीपी वसाहतीतील. या वसाहतीत १७ इमारती असून, त्या धोकादायक बनल्या आहेत. त्यामुळे येथील पाच हजार रहिवासी मृत्यूच्या सावटाखाली वावरत असून, या इमारतींच्या पुनर्विकासाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai home news
मुंबई


पीएमजीपी वसाहतीत ९९४ कुटुंबे म्हणजे सुमारे पाच हजार लोकवस्ती आहे. या इमारती सुमारे ३०हून अधिक वर्षे जुन्या असून, त्यांच्या दुरवस्थेमुळे रहिवासी जीव मुठीत धरून राहत आहेत. येथील अनेक इमारतींना टेकू लावण्यात आले आहेत. काही इमारती कधीही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राहिवाशांनी स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. मागील १६ वर्षांपासून या इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. त्यामुळे आमचा जीव टांगणीला लागला आहे. किती वर्षे आम्ही मरणयातना सहन करायच्या, असा प्रश्न हे राहिवाशी विचारत आहेत.

कुटुंबातील संघर्ष वाढणार? दादांच्या बालेकिल्ल्यात ताईंचे रणशिंग, वक्तव्याने भुवया उंचावल्या!


मागील आठवड्यात वसाहतीतील दर्शन को. ऑप. सोसायटी, इमारत क्रमांक-७, घर क्रमांक-८मध्ये पहिल्या मजल्यावर राहणारे ज्येष्ठ नागरिक मॅरी अथणी यांच्या घराच्या मागील बाजूचा बाल्कनीचा मोठा भाग कोसळला. त्यात ते थोडक्यात बचावले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी धोकादायक इमारतीतील रहिवासी भयभीत झाले आहेत.

घरातील स्लॅब व छताचा भाग कोसळणे, प्लास्टर निखळणे अशा घटना वारंवार घडत आहेत. या इमारतींची देखभाल म्हाडामार्फत नियमित करण्यात येत नसल्यामुळे त्या जीर्ण झाल्या आहेत, अशी माहिती रहिवाशांकडून देण्यात आली.

'सरकारी यंत्रणा ढिम्म!'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वसाहत परिसरात लवकरच एका कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्यावेळेस या अतिधोकादायक इमारतींची पाहणी करणार का, असा प्रश्न येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार रवींद्र वायकर यांनी केला आहे. या इमारतींच्या पुनर्विकासासाठी विधानसभेत अनेक वेळा लक्षवेधी, तारांकित प्रश्न, औचित्याचा मुद्दा, अर्धा तास चर्चांमध्ये प्रश्न उपस्थित केले. म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे बैठका घेण्यात आल्या. मात्र सरकारी यंत्रणा ढिम्म असल्याचे वायकर म्हणाले.

महत्वाचे लेख