म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
गुटखा तंबाखूच्या साठवणूक आणि विक्रीवर बंदी असली तरीही इतर राज्यांतून गुटख्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होते, यावर आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करून दोनशे वाहनचालकांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित केले आहेत. महाराष्ट्रातील ही पहिली मोठी कारवाई असून त्यामुले तंबाखू, गुटखा, पानसुपारी तसेच आरोग्यासाठी अपायकारक असलेल्या अशा प्रकारच्या उत्पादनांच्या वाहतुकीवर चाप बसणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या या कारवाईला दुजोरा दिला आहे.
गुटखा, पानमसाला, सुंगधित तंबाखूचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर बंदी असूनही बाहेरील राज्यांतून गुटख्याची तस्करी आजही सुरू आहे. त्यावर आळा घालण्यासाठी अशा प्रकारे अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे होते. २०१२ ते १८ या सहा वर्षाच्या कालावधीमध्ये गुटखाबंदी लागू करूनही परराज्यांतून आलेला १४१.१३ कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे अशा प्रकारे गुटख्याच्या वाहतुकीवर निर्बंध आणले तर या प्रकारांना आळा बसेल, अशी कडक भूमिका घेत अन्न व औषध प्रशासनाने अशा २०० वाहनांवर ही कारवाई केली आहे.
उत्तरप्रदेश, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश आणि सिल्व्हासा या ठिकाणांहून गुटखा महाराष्ट्रात आजही येतो. बाहेरच्या राज्यातून छुप्या पद्धतीने आणून विक्री करण्यात येणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांचा शोध घेणे हे सर्वात मोठे आव्हान अन्न व औषध प्रशासनासमोर होते. कॅन्सरचे राज्यातील वाढते प्रमाण आणि तंबाखूच्या विळख्यामध्ये अडकत चाललेल्या शाळकरी मुलांसह तरुणांनाही यापासून वेळीच वाचवण्यासाठी या धडक कारवाईचा फायदा निश्चितपणे होणार असल्याचा विश्वास एफडीएच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी व्यक्त केला. तीन महिन्यांसाठी परवाना रद्द वा निलंबनाच्या स्वरूपामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.