म. टा. प्रतिनिधी, मुंबई
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत २४ महिला आमदार निवडून आल्या आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत महिला आमदारांची संख्या चारने वाढली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपच्या १२ महिला आमदार निवडून आल्या असून, त्यानंतर काँग्रेसच्या पाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन, तर शिवसेनेच्या दोन महिला आमदार आहेत. या निवडणुकीत एकूण २३५ महिला उमेदवार रिंगणात होत्या.
प्रतिभाताई पाटील यांच्या एक वर्ष आधी म्हणजे १९७८ ते ७९ मध्ये प्रभा राव विरोधी पक्षनेत्या होत्या. १९८९ ते १९९० या काळात मृणालताई गोरे यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषविताना विधिमंडळात जनसामान्यांच्या प्रश्नावर तत्कालीन सरकारला धारेवर धरले होते. अनेक महिला आमदारांनी मंत्रिपदे भूषविली आहेत. महाराष्ट्रात एकूण मतदार ८ कोटी ९७ लाख असून, त्यात महिला मतदारांची संख्या ४ कोटी ३८ लाख आहे. त्यातुलनेत महिला आमदारांची संख्या विधानसभेत वाढायला हवी, असे महिला मतदारांना वाटते.
यंदाच्या निवडणुकीत १२ विद्यमान महिला आमदार पुन्हा विधानसभेत निवडून आल्या आहेत. त्यापैकी आठ आमदार सत्ताधारी भाजपच्या, तीन काँग्रेसच्या आणि एक राष्ट्रवादीची आमदार आहे. विधानसभेत पुन्हा निवडून येणाऱ्या महिला आमदारांमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे, मनीषा चौधरी, विद्या ठाकूर, देवयानी फरांदे, सीमा हिरे, माधुरी मिसाळ, मोनिका राजळे, भारती लव्हेकर, काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमनताई पाटील यांचा समावेश आहे.
विधानसभेत प्रथम निवडून जाणाऱ्या महिला आमदारांमध्ये राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे, अदिती तटकरे, शिवसेनेच्या लता सोनावणे व यामिनी जाधव, तर भाजपच्या मुक्ता टिळक, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, नमिता मुंदडा आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर, सुलभा खोडके तसेच गीता जैन (भाजप बंडखोर) आणि मंजुळा गावित (अपक्ष) यांचा समावेश आहे.
राज्याच्या ६० वर्षांत महिला मुख्यमंत्री नाही!
राज्यात १९७२ ते १९७७ या काळात सर्वाधिक म्हणजे २८ महिला आमदार निवडून आल्या होत्या. त्यानंतर कोणत्याही विधानसभा निवडणुकीत इतक्या संख्येने महिला आमदार निवडून आलेल्या नाहीत. पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्र अशी राज्याची ओळख असली तरी सुमारे सहा दशकांच्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात अद्यापही महिलेला मुख्यमंत्रिपद मिळालेले नाही. महाराष्ट्र विधानसभेतील महिला आमदार असलेल्या प्रतिभाताई पाटील यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद, मंत्री आणि देशातील सर्वोच्च असलेल्या राष्ट्रपती पदापर्यंत यशस्वी मजल मारली आहे.