अ‍ॅपशहर

जीवनवाहिनी बनली जीवघेणी; मुंबईत दिवाळीच्या तीन दिवसांत ३७ रेल्वेबळी

मुंबई रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पार पडलेल्या लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी या दिवशी आणि मंगळवारी या दोन दिवशी दररोज १२ मृत्यू झाले आहेत. दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेच्या बुधवारी १३ नागरिकांचा बळी गेला आहे.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 28 Oct 2022, 9:31 am
मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी मुंबईची लोकल सेवा ऐन दिवाळीच्या दिवसांत मात्र जीवघेणी ठरली. दिवाळीच्या तीन दिवसांत तब्बल ३७ प्रवाशांना रेल्वेमार्गांवर प्राण गमवावे लागले. वाढत्या अपघातांमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai local
जीवनवाहिनी बनली जीवघेणी; दिवाळीच्या तीन दिवसांत ३७ रेल्वेबळी, रुळ ओलांडणे घातक


सणासुदीच्या निमित्ताने लोकल ट्रेनना प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. धावत्या लोकलमधून पडणे, रेल्वे रूळ ओलांडणे, धावती लोकल पकडणे, अज्ञात रेल्वेगाडीची धडक या कारणांमुळे रेल्वे मार्गावरील अपमृत्यू वाढते आहेत. मध्य, हार्बर, पश्चिम, ट्रान्स हार्बर, खारकोपर-उरण लोकल या पाच मार्गांवर मुंबईची लोकल सेवा धावते. यापैकी मध्य-हार्बर-पश्चिम या मार्गावरील प्रवासी संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे, मध्य आणि पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकल धावत आहे. मुंबई लोकलवरील अपघाती मृत्यूंची नोंद मुंबई रेल्वे पोलिसांकडे असते. रेल्वे स्थानकात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांची आहे.

मुंबई रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पार पडलेल्या लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी या दिवशी आणि मंगळवारी या दोन दिवशी दररोज १२ मृत्यू झाले आहेत. दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेच्या बुधवारी १३ नागरिकांचा बळी गेला आहे.

मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस हद्दीत सर्वाधिक, नऊ मृत्यू झाले आहेत. कल्याण आणि डोंबिवलीत मिळून एकूण आठ मृत्यूंची नोंद आहे. कुर्ला, वडाळा, ठाणे, बोरिवली, पालघर, वसई रोड या स्थानकात देखील रेल्वे अपघातांमुळे प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहे. दिवाळीच्या दिवसात रेल्वे स्थानकावर आणि लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. यामुळे गर्दीच्या रेट्याने लोकलमधून प्रवासी पडून अपघात झाले आहेत. कुर्ला स्थानक परिसरात रुळांजवळील खांबाला धडकल्याने एक प्रवासी जखमी झाला आहे.

रुळ ओलांडणे घातक

वारंवार सूचना देऊनही रेल्वे रूळ ओलांडणे प्रवाशांसाठी प्राणघातक ठरत आहे. लोकल हॉर्न वाजवत येताना दिसत असतानादेखील आपण सहज रूळ ओलांडू असा अतिआत्मविश्वास प्रवाशांना नडतो आणि मृत्यू ओढवतो. मेल-एक्सप्रेसचा वेग प्रचंड असताना अनेकदा अंदाज चुकतो आणि प्रवाशांना जीव गमवावा लागतो. घरगुती वाद, आर्थिक तंगी यांना कंटाळून रेल्वे रुळांवर येऊन आपले जीवन संपवतात. रेल्वे प्रशासनाने दोन रेल्वे स्थानकादरम्यान कुंपण उभारावे तसेच रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी प्रवाशांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे, असे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज