- मुंबई विद्यापीठात ६३ कॉलेजे प्रस्तावित
- रत्नागिरी, सिंधुदुर्गात कौशल्याधारित कॉलेजे
- रायगडात उपकेंद्र व संशोधन केंद्रांची शिफारस
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
२०१९-२० या शैक्षणिक वर्षात राज्यात सुमारे ५५० नवी कॉलेजे सुरू होणार आहेत. सर्व अकृषक विद्यापीठांच्या बृहत आराखाड्यावर चर्चा करण्यासाठी नुकतीच सह्याद्री अतिथीगृहात 'राज्य उच्च शिक्षण आणि विकास परिषदे'ची (माहेड) बैठक पार पडली. यात ही नवीन कॉलेजे प्रस्तावित करण्यात आली.
प्रत्येक विद्यापीठ आपल्या कक्षा रुंदावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शिक्षण मिळावे यासाठी बृहत आराखडा तयार करत असते. त्यात नवीन कॉलेजे मंजूर करण्याबाबत एक वार्षिक योजना तयार करण्यात येते. या सर्वावर चर्चा करण्यासाठी नुकतीच ही बैठक घेण्यात आली. यात राज्यातील १३ अकृषक विद्यापीठांमध्ये ५५० कॉलेजे प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी दिली. यामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेजांबरोबरच यंदा प्रथमच कौशल्याधारित कॉलेजे प्रस्तावित करण्यात आली आहेत. प्रत्येक ठिकाणची भौगोलिक व सांस्कृतिक रचना लक्षात घेऊन ही कॉलेजे उभारण्याचा विचार करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
मुंबई विद्यापीठात एकूण ६३ कॉलेजे प्रस्तावित करण्यात आल्याचे समजते. प्रामुख्याने विद्यापीठाच्या बृहत आराखड्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सागरी जिल्ह्यांमध्ये विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमांची कॉलेजे सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यात रत्नागिरीत नेव्हल आर्किटेक्चर, मरिन इंजिनीअरिंग (शिप बिल्डिंग) व आर्किटेक्चर कॉलेज उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यावसायिक अभ्यासक्रम प्रस्तावित केले असून, यात हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट व ललित कला कॉलेजची शिफारस करण्यात आली आहे. विद्यापीठाचे उपकेंद्र व संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात यावे, अशी शिफारसही करण्यात आली आहे. या बृहत् आराखड्यामध्ये कौशल्याधारित अभ्यासक्रमांना प्राधान्य देण्यात आले असून, त्यांचे शिक्षण देण्यासाठी जास्तीत जास्त कॉलेजे पुढाकार घेतील, अशी अपेक्षा आहे.
रात्र व मुलींसाठीच्या
कॉलेजांची शिफारस
मुंबई शहरात मुलींसाठी कॉलेज, रात्र कॉलेज व दक्षिण मुंबईमध्ये विधी कॉलेजची शिफारस करण्यात आली आहे. मुंबई उपनगर व नवी मुंबई क्षेत्रात मुलींसाठी कॉलेज, ललित कला कॉलेज आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या युवकांसाठी रात्र कॉलेज प्रस्तावित करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यात, विशेषतः कल्याणमधील ग्रामीण भागामध्ये व भिवंडी तालुक्यात विधी, आर्किटेक्चर व फार्मसी कॉलेज प्रस्तावित करण्यात आले आहे, अशी माहिती विद्यापीठाने अधिसभेत दिली होती.