म. टा. प्रतिनिधी, मुंबई
मुंबई बंदरावर शनिवारी दाखल झालेल्या एम. व्ही. बौडिका या जहाजावरील फिलिपाइन्सच्या एका नागरिकाला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे. या जहाजावर कर्मचाऱ्यांसह ८२४ जण असून यापैकी कोणीही भारतीय नाही, तसेच इतर कुणाला कसलीही लक्षणे नाहीत, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
रुग्णालयात दाखल झालेल्या ६० प्रवाशांपैकी ४९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या पाच जण मुंबई येथे तर प्रत्येकी तिघे सांगली व पुण्यात भरती आहेत. राज्यात सध्या ३९ विलगीकरण कक्षांमध्ये ३६१ खाटांची उपलब्धता आहे.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार वुहान शहरातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना भरती करण्याचे आणि त्यांच्या चाचण्या करण्याचे धोरण राज्यात राबविण्यात येत आहे. इतर भागातून येणाऱ्या प्रवाशांचा पाठपुरावा १४ दिवसांकरता करण्यात येत आहे. विविध ठिकाणांहून राज्यात आलेल्या एकूण १९३ प्रवाशांपैकी १३७ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.
१८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ६० जणांना दाखल करण्यात आले आहे. आज पर्यंत दाखल करण्यात आलेल्यापैकी ५० जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा पुणे येथील एन आय व्ही संस्थेने दिला आहे. शनिवारी मुंबई, सांगली आणि नायडू रुग्णालय, पुणे येथे प्रत्येकी तीन प्रवाशांना सौम्य लक्षणे आढळल्याने भरती करण्यात आले. या तिघांचे नमुने प्रयोगशाळेस पाठविण्यात येतील असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.